सरपंच दत्ता गांजाळे : तालुक्यात सक्षम अधिकारी नाही
मंचर- आंबेगाव तालुक्यात सक्षम अधिकारी नसल्याने काही प्रमाणात आपत्ती व्यवस्थापनात बाधा येत आहे, अशी तक्रार मंचरचे लोकनियुक्त सरपंच दत्ता गांजाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रमुख अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंबेगाव तालुक्यातील जनतेने व काही चांगल्या अधिकाऱ्यांनी करोनापासून तालुका सांभाळला आहे. अद्यापपर्यंत आंबेगाव तालुक्यात एकही करोना विषाणूचा रुग्ण आढळून आलेला नाही. पण तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यात मागील आठवड्यात 250 ते 300 लोकांनी छुप्या पद्धतीने मुंबई-पुण्याहून आंबेगाव तालुक्यात प्रवेश केला आहे.
या सर्व लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे होते. पण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून विलगीकरणासाठी कोणतीही कार्यवाही झाली नाही. तसेच सरकारकडून धान्य येऊनही तालुक्यातील गोर-गरीबांना वेळेवर आणि नियमानुसार धान्य मिळत नाही, त्यामुळे आंबेगाव तालुक्यात रेशनिंग बाबत व रेशनिंग दुकानदारांबाबत नागरिकांच्या तक्रारी निर्माण होत आहे. त्याचा फटका गोर-गरिबांना बसत आहे.
रेशनिंग दुकानदारांवर आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही, उलट नागरिकांनी फोन केल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर दिली जात नाही किंवा फोन उचलला जात नाही. या गोष्टींना वेळीच आळा नाही घातला तर आंबेगाव तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सक्षम आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. नाहीतर जनतेने आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरेल, अशी भीती सरपंच दत्ता गांजाळे यांनी व्यक्त केली.
- आंबेगाव तालुक्यातील नागरिक आणि प्रशासन यांचा समन्वय असल्याने तालुका करोना”मुक्त’ तुर्ततरी आहे. नागरिकांच्या काही अडचणी किंवा सूचना असल्यास त्यांनी तहसील कार्यातील मेलवर आपल्या शंका पाठवाव्यात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शंकाचे निरसन केले जाईल. नागरिकांनी यापुढील काळातही प्रशासनाला सहकार्य करावे.
– रमा जोशी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, तथा तहसीलदार