मुंबई – देशात गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपने विजय मिळवल्यानंतर राज्यात देखील आत्तापासूनच निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. भाजपने २०२४ मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे एमआयएमने महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. यातच इम्तियाज जलील यांच्या भेटीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलतांना राजेश टोपे म्हणाले,’इम्तियाज यांच्यासोबत झालेली भेट अनौपचारिक होती. जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर होती. काही दिवसांपूर्वी इम्तियाज यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते. या भेटी दरम्यान, काही मुद्यांवर अनौपचारिक चर्चा झाली.’
पुढे ते एमआयएमने महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्तावावर म्हणाले,’एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला असतानाच एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.’असं विधान टोपे यांनी केलं आहे.
दरम्यान,शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते संजय राऊत म्हणाले,’औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि राज्यातल्या कोणत्याही पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो.’ अस म्हणत राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.