पुणे – महापालिकेकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना राबविली जाते. त्यासाठी त्यांच्या वेतनातून एकवट रक्कम वजा केली जाते. ही रक्कम सर्वांसाठी सारखीच असते. मात्र, यंदापासून रकमेत महापालिकेकडून बदल करण्यात आला आहे. वर्ग-1 च्या अधिकाऱ्यांसाठी 25 लाखांपर्यंत, तर वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचाऱ्यांसाठी 15 लाखांचा विमा अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या भेदभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.
आधीच कमी वेतन आणि आयत्या वेळी आजारपण उद्भवल्यास पैशाची गरज असते. अशा वेळी अशा प्रकारे विमा योजनेत भेदभाव कशासाठी? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर, “हा निर्णय आमचा नसून, राज्य शासनानेच या योजनेच्या नियमांत बदल केल्याने महापालिकेने त्याची केवळ अंमलबजावणी केली आहे,’ असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेकडून 2016-17 पासून ही योजना राबविली जात असून मागील वर्षापर्यंत कामगार कल्याण विभाग कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखांचा विमा उतरवत असे. सर्व कर्मचाऱ्यांना एकच रक्कम आणि सारखा लाभ असायचा. शासनाने अपघात विमा योजनेच्या नियमात बदल केल्याने महापालिकेने विमा कंपनीकडून नव्याने दर मागवले होते. त्यानुसार यावर्षी विम्याचा हप्ताही वाढविण्यात आला. या योजनेत महापालिकेच्या तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश केला जातो. या अपघात विमा योजनेतून आतापर्यंत 19 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत.
खरी गरज वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांना
या अपघात विमा योजनेची खरी गरज वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचाऱ्यांना आहे. प्रत्यक्षात हे कर्मचारी स्वच्छता तसेच इतर धोकादायक ठिकाणी काम करतात. त्यामुळे त्यांना अपघाताचा धोका असतो. तसेच, त्यांचे 90 टक्के काम कार्यालयाबाहेर प्रत्यक्ष रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी असते. त्याच वेळी वर्ग-1 व 2 च्या कर्मचारी तुलेलेने फिल्डवर कमी असतात. त्यांना वेतनही अधिक असते. अशा स्थितीत गरज असलेल्या घटकाचीच विमा रक्कम कमी ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मी तृतीयश्रेणी स्वच्छता कर्मचारी आहे. यापूर्वी तीन-वेळा माझा अपघात झाला आहे. आम्ही जीव मुठीत घेऊन काम करतो. मात्र, आमच्यापेक्षा कितीतरी अधिक वेतन असलेल्या अधिकाऱ्यांना जादा विमा संरक्षण आहे. आम्ही त्यांच्याइतका हप्ता भरू शकतो. आमच्या विम्याची मर्यादा वाढवावी, असे एक स्वच्छता सेवक म्हणाले.