तब्बल वीस वर्षांपासून आम सभाच नाही; जनतेच्या अडचणींबाबत आमदार, खासदारांमध्ये उदासीनता?
अरुण पवार
पाटण – पाटण तालुक्याच्या जनतेला आपली गाऱ्हाणी मांडण्याचे एकमेव व्यासपीठ असलेल्या तालुक्याच्या आमसभेचा राजकारण्यांना विसर पडला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आम सभाच झाली नसल्याने लोकांनी कोणापुढे प्रश्न मांडायचे? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
पाटणची आमसभा पंचायत समितीच्या मार्फत भरवली जाते. तालुक्याचे आमदार आम सभेचे अध्यक्ष असतात. दर वर्षातून एकदा आमसभा घ्यावीच लागते. या आमसभेला आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच आणि सर्व तालुक्यातील जनतेला उपस्थित राहून आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो.
पाटण तालुक्यात 2004 साली आमसभा झाली होती. त्यावेळी पाटणचे आमदार शंभूराज देसाई, तर खासदार श्रीनिवास पाटील होते. पाटणच्या बचत भवनमध्ये झालेल्या आमसभेत देसाई गट आणि पाटणकर गट यांच्यात प्रश्न विचारण्यावरून खडाजंगी झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावले होते. खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार शंभूराजे देसाई, तसेच पाटणकर गटाचे नेते आणि सत्यजित पाटणकर व्यासपीठावर उपस्थित होते. तेव्हापासून आजतागायत पाटणला आम सभेचे नाव घेतले जात नाही.
सध्या तर पाटण पंचायत समितीत अधिकारीच कारभार पाहत आहेत. कारण, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका खोलंबल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवणारेच नसल्यामुळे पंचायत समितीच्या शासकीय अधिकाऱ्यांना सध्या रान मोकळे आहे. इकडे आमसभा तर नाहीच. पण तिकडे पंचायत समितीच्या सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणारे पंचायत समिती सदस्य नाहीत. त्यामुळे जनतेने आपल्या व्यथा मांडायच्या तरी कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाटण पंचायत समितीत सभापती, उपसभापती किंवा पंचायत समिती सदस्य नसल्यामुळे तेथे कामासाठी जाणाऱ्या जनतेला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनधरणी करावी लागत आहे. तसेच कामही लवकर होत नसून अनेकवेळा प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आमदार, खासदारांसह सर्व विभागांच्या प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीती असणारी आमसभा तालुक्यात होणे महत्वाचे होते. यामुळे लोकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागले असते. तसेच यामाध्यमातून आमदार, खासदारांना तालुक्यातील जनतेच्या व्यथा काय आहेत? हे जागेवरच कळाले असते. तेव्हा यापुढेतरी संबंधित लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाटणला आम सभेचे आयोजन करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
आमदारांच्या जनता दरबाराला विरोधकांची दांडी
पाटण तालुक्याचे आमदार, राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. “सहा महिन्यातून एकदा जनता दरबार’ अशी पद्धत त्यांनी रूढ केली आहे. जनतादरबारामुळे लोकांचे प्रश्न जागेवरच निकाली लागत आहेत. मात्र, पाटण तालुक्यात दोन राजकीय गट असल्याने शंभूराज देसाई यांच्या जनता दरबाराला विरोधी गटाचे लोक उपस्थित राहत नाहीत, आपले प्रश्न मांडत नाहीत. त्यामुळे आमसभा भरवल्यास आमदार, खासदार यांचे समर्थक आणि ज्यांचे प्रश्न आहेत, अशी सर्व जनता आमसभेला उपस्थित राहील, यात शंका नाही.
अधिकाऱ्यांनी हात झटकले…
न झालेल्या आमसभेबाबत विचारणा करण्यासाठी पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोरख शेलार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी रजेवर आहे. याबाबत मी बोलू शकत नाही. त्यांनतर सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत वाघ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमसभा बोलवायची झाली, तर आमदारांनी तारीख ठरवून सभापतींनी ती बोलवायची असते, असे सांगून एकप्रकारे दोघांनीही हात झटकून याबाबत स्पष्ट बोलणे टाळले.
=======================