पुणे -जांभूळवाडी तलावातील माशांचा मृत्यू तलावात थेट सोडण्यात येत असलेल्या ड्रेणेजच्या पाण्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महापालिकेकडून या तलावाच्या पाण्याच्या तपासणी करण्यासाठी मॉडर्न महाविद्यालयाच्या मत्स्यरोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेकडून करून घेण्यात आली होती, त्याचा अहवाल 23 मे रोजी महापालिकेच्या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयास प्राप्त झाला. या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या शिवाय, तापमान तसेच तलावाच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे निष्कर्षही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष साठे यांनी माहिती अधिकारा अंतर्गत हा अहवाल मिळविला आहे.
काय आहे अहवालात?
जांभूळवाडी तलावातील शेकडो मासे दिड आठवड्यापूर्वी अचानक मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर, पर्यावरण प्रेमींसह, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींही तलावास भेट तलावाची स्वच्छता करावी तसेच ड्रेनेजचे पाणी थांबवावे, अशी मागणी करीत माशांच्या मृत्यू प्रकरणी तलावाची तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाकडून 16 मे रोजी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून तपासणी करून घेण्यात आली. 17 मे रोजी महाविद्यालयाकडून या पाण्याचे नमुने चार वेगवेगळ्या वेळांना घेऊन ही तपासणी करण्यात आली. त्यातून, या तलावात येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तलावात मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडण्यात येत आहे. या शिवाय, सोसायट्या तसेच आसपासचे हॉटेलही थेट सांडपाणी सोडत आहेत. त्याबाबत आम्ही वारंवार स्थानिक म्हणून तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, या प्रकरणी आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, घनकचरा विभाग सर्व विभागांच्या जबाबदार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
– संतोष साठे, अध्यक्ष, संघर्ष सेना
अहवालाचे निष्कर्ष…
तलावात सोसायट्यांचे ड्रेनेज पाणी थेट येणे
तलावात बांधकामांचा राडारोडा टाकणे
उन्हामुळे पाण्याचे तापमान वाढणे
पाण्यामधे डिझॉल्व ऑक्सिजनचे प्रमाण कमी
खारट पाण्याचे प्रमाण वाढले
विषारी धातूंचे प्रमाण अधिक आढळले