पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांची मागणी
सोरतापवाडी- पूर्व हवेलीतील नवीन मुठा कालवा गेले अडीच महिने बंद असल्यामुळे लोणी काळभोर,कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, शिंदवणे आणि इतर अनेक गावांत शेतीला पाणी टंचाई जाणवू लागली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झालेला असून देखील या हंगामात लावलेल्या पिकाला पाणी कमी पडू लागल्याने पिके जळून चालली आहेत, त्यासाठी लवकरात लवकर नवीन कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
बाजरी, मका, गहू, ऊस आणि फळ लागवड असलेल्या पूर्व हवेलीचा पट्टा सध्या पाण्याअभावी जळून चालला आहे . पिकांना नवसंजीवनी द्यायची असेल तर सध्या पाण्याची आवश्यकता असून, खातेवाटपाच्या गोंधळात नव्या कालव्याला पाणी सोडायचे राहून गेले आहे. त्यात डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी अजून कालव्यात पाणी आले नाही, सर्व कामे पूर्ण करून लवकरात लवकर शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून वाढू लागली आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे मागील सर्व पिके शेतकऱ्याच्या हातून गेली आहेत. आता पाण्याअभावी जर ही पिके देखील हातातून गेली तर शेतकरी पुन्हा
अडचणीत येऊ शकतो. परिसरातील वहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी खोल गेली आहे.कालव्या शेजारील वरच्या भागात पाणी कमी पडू लागले आहे. गावाच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो आहे. नुकताच पेरणी झालेल्या गहू पिकाला पाणी मिळत नसल्याने या पिकाची वाढ खुंटली आहे, त्यामुळे या भागातील संबंधित अधिकारी वर्गाने लवकरात लवकर हालचाल करून नवीन कालव्याला पाणी सोडण्याची पूर्तता करावी, अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी केली आहे.