नवी दिल्ली: नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी आम्ही बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. आपल्या धर्मनिरपेक्षतेप्रती असलेल्या वचनबद्धतेवर कुणीही शंका घेऊ नये, असे देखील चौधरी म्हणाले.
यापूर्वी, बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी देशभरात एनआरसी लागू करण्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच एनआरसी म्हणजे नागरिकत्वाची नोटबंदी असल्याची टीका देखील किशोर यांनी केली होती.
दरम्यान, ईशान्य राज्यांतील हिंसाचारामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथमच नागरिकत्व कायद्यात काही बदलांचे संकेत दिले आहेत. धनबाद येथील मोर्चाला संबोधित करताना ते म्हणाले की, “या कायद्याबद्दल काही लोकांना शंका आहेत आणि त्याबद्दल मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी माझी भेट घेतली. मी त्यांना आश्वासन दिले आहे की ख्रिसमस नंतर काही तोडगा निघेल आणि त्यांना या कायद्याची चिंता करण्याची गरज नाही”.