बिजिंग : दोन्ही देशातील मतभेदांचे रुपांतर वादात होणार नाही, असे स्पष्ट करत भारत आणि चीनच्या नेतृत्वावर एकमत झालेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी व्हावी, असे चीनने म्हटले आहे.
भारत चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवस बैठक झाली. त्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनियिंग यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, सहा जूनच्या दुपारपासून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची चुसुल मोल्डा भागात बैठक झाली. सीमेवरील स्थितीबाबत लष्करी आणि राजनैतिक पातळीवर अलिकडेच चर्चा झाली आहे. दोन्ही देशांत एकमत झालेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी गरजेची असून मतभेदांचे रुपांतर वादात होऊ नये याची काळजी दोन्ही बाजूंनी घ्यायला हवी.
सीमेवर शांतता नांदावी यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. चांगले वातावरण निर्माण करण्यात येत आहे. सध्या परिस्थिती स्थीर आणि नियंत्रणात आहे. संबंधित मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी चर्चेची दोन्ही बाजूंची तयारी आहे, असे हुआ म्हणाल्या.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीमेवरील सध्याचा तणाव दोन्ही देशांच्या लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेने दूर करता येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी चीनने आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.