सोरतापवाडी – “मांजरी उपबाजारात शेतकऱ्यांचे काही चालेना’ या मथळ्याखाली दैनिक प्रभातने मांजरी बाजारातील व्यथा मांडल्या. याची तातडीने दखल घेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी मांजरी उपबाजारात दुबार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संचालक सुदर्शन चौधरी यांनी दिली.
येथे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचाच माल विकला जाणार असल्याचा निर्णय सभापती, उपसभापती, संचालक मंडळांनी घेतला आहे. याचे स्वागत शेतकऱ्यांनी केले. मात्र येथे काही वेगळाच प्रकार सुरू असल्याचे प्रभातने उजेडात आणले. शेतकऱ्यांचा माल घेऊन त्याची कमिशनवर विक्री करून भरघोस नफा मिळविणारे दुबार विक्रेते या बाजारातून मालामाल झाले. शेतकरी मात्र कायमच उपाशी राहिला. बाजार समितीची या दुबार विक्रेत्यांना पाठबळ असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.
बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर या बाजारात दुबार विक्रेते बंद होतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण झाले उलटे. दुबार विक्रेते वाढले आणि ते रोज 70 ते 80 हजार भाजीपाल्याच्या जुडया विकत असल्याचे निदर्शनास आले होते. परिणामी मालाची किंमत बाजार फुटायच्या आतच व्यापारी व दुबार विक्रेते ठरवत असल्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नसे.
पडत्या भावाने शेतकऱ्यांना तो माल विकावा लागत असे. मुळात शेतकरी बाजार ही संकल्पनाच यामुळे धोक्यात आली होती. त्यामुळे दैनिक प्रभातने या बाजाराची व शेतकऱ्यांची व्यथा जनते समोर मांडताच समितीने ताबडतोब दुबार विक्री बंदचा निर्णय घेतला.
आज झालेल्या दुबार विक्री बंदच्यामुळे सर्व शेतीमालाचे भाव वाढले असून मेथीची एक गड्डी कालपर्यंत 10ते 15 रुपयेपर्यंत जात होती; पण आज 22 ते 25 रुपये बाजारभाव झाला. शेतकऱ्यांना दुबार विक्रीमुळे फायदा होत असून दुबार विक्री ही कायमची बंद केली पाहिजे असे कुंजीरवाडी येथील शेतकरी किशोर धुमाळ यांनी सांगितले.
पुदिन्याची गड्डी 5ते8 रुपये जात होती पण आज त्या गड्डीला 10 ते12 रुपये बाजार भाव मिळाला 25रुपये किलो किलोने जाणारी मिरची आज 40 ते 50रुपये किलोने गेली. गवार पहिले 50 रुपये किलोने जात होती तीच आज गावात 70ते 90ते रुपये किलोने गेली. यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला असून अशीच दुबार विक्री बंद राहिली पाहिजे असे फुरसुंगी गायकवाड वाडी येथील भाऊसाहेब कोळपे यांनी सांगितले.
फ्लॉवर 40ते 45 रुपये किलो जाणारी 60 रुपये किलो गेली. कोबी20ते 25 रुपये किलो जाणारे आज 30ते 40 रुपये किलोने गेली यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाल्याचे वडगाव बुद्रुक येथील शेतकरी राहुल कांबळे यांनी सांगितले.
या पुर्वी सुद्धाअनेक वेळा दुबार विक्रेत्यांवर कारवाई झाली असून ही कारवाई फक्त लुटूपुटुची असल्याचे दाखवून पुन्हा दोन दिवसांनी दुबार विक्रेते विक्री करताना दिसत होते म्हणून नवीन संचालक मंडळांनी शेतकऱ्यांच्याच हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा. असे अनेक हवेलीतील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत शेतकऱ्यांचा कळवळा असणारा शेतकरी नेता यादुबार विक्रेत्यांची बाजू घेत असून बाजार समितीच्या सचिवांनी व संचालक मंडळाने घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयाला विरोध करतानाच व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल होत आहे यावरून शेतकरी नेते शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त स्वतः च्या स्वार्थासाठी विरोध करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
फेक्स लावून जनजागती करणार
आज सकाळी दुबार विक्रेत्यांनी ठिय्या आंदोलन करताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी संचालक, अधिकारी व दुबार विक्रेत्यांची बैठक घेऊन. आजपासून दुबार विक्री बंद असे संचालक मंडळाने सांगितले. त्यानंतर उद्या (बुधवारी) सभापती दिलीप काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर पुढील कारवाई ठरवली जाईल; परंतु कसल्याही प्रकारच्या दुबार विक्रीला संचालक मंडळ पाठीशी घालणार नसल्याचे संचालक सुदर्शन चौधरी, प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप व सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले. तसेच मार्केटच्या आवारात ठीक ठिकाणी दुबार विक्री बंदचे फ्लेक्स लावून जनजागृती करण्यात येईल.