कोलकता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्यात विनामास्क फिरणे महागात पडणार आहे. त्या शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना थेट अटक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
देशात करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वच स्तरांवरून सतर्कता आणि सज्जता बाळगली जात आहे.
त्यामध्ये कोलकता पालिका प्रशासन आणि पोलीसही मागे राहिलेले नाहीत. त्यांच्या संयुक्त बैठकीत करोनाविषयक निर्बंध आणि नियमांच्या पालनाची योग्य निश्चिती करण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले.
त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्कविना फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जाईल. अर्थात, त्यांना 100 रूपये दंड ठोठावून जामिनावर सोडले जाईल. दुकानदार, व्यावसायिक आणि ग्राहकांनाही मास्क अनिवार्य आहे. बाजारपेठांमध्ये विनामास्क आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. देशातील बहुतांश राज्यांप्रमाणे बंगालमध्ये सध्या करोना संकट नियंत्रणात आहे.
तेथील करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत घट होताना दिसत आहे. तसे असले तरी बंगाल सरकारकडून सर्वतोपरी दक्षता बाळगली जात आहे. त्यातून त्या राज्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.