मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘कृ. पां. सामक जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे, अध्यक्ष दिलीप सपाटे आदी उपस्थित.
वृत्तपत्र प्रतिनिधींसाठीचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. तरुण भारत (बेळगाव)च्या रत्नागिरी प्रतिनिधी जान्हवी पाटील यांना तर इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींसाठीचा पुरस्कार ‘एबीपी माझा’चे उस्मानाबाद प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना देण्यात आला. मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघ सदस्यांकरिता देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘लोकसत्ता लाईव्ह’चे विशेष प्रतिनिधी संजय बापट यांना मिळाला.
पत्रकार हे नेहमी अनुभव घेऊन सडेतोड लिहितात. निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारणाची समीक्षा करत त्याला योग्य दिशा देण्याबरोबरच राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी, राज्यासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारितेने यापुढील काळातही योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.