नवी दिल्ली : मध्य प्रदेशात आता राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या भेट घेतल्यानंतर, कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. कॉंग्रेससाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Congress leader Digvijaya Singh: We have evidence that three chartered plane (which reportedly flew Congress MLAs to Bengaluru) were arranged by the BJP. This is part of a conspiracy to reverse the mandate of people of Madhya Pradesh because Kamal Nath has acted against mafias. pic.twitter.com/zafZ7y2oDh
— ANI (@ANI) March 10, 2020
दिग्विजय सिंह म्हणाले, मध्य प्रदेशच्या जनतेने दिलेल्या जनादेशाला उलटवण्याचे हे षडयंत्र आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माफियांविरोधात कारवाई केल्यामुळे असे केले जात आहे. जमीन, बांधकाम व्यवसायासह प्रत्येक माफियाविरोधात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कठोरपणे कारवाई केली आहे, त्यामुळे हे (भाजपा) घाबरलेले आहेत.
तसेच, भाजपाने 15 वर्षे ई-टेंडरिंगमध्ये घोटाळे केले, व्यापम घोटाळा केला, माध्यमांमध्ये घोटाळा केला. या सर्वांवरचा पडदा उघडला जात आहे. हनी ट्रपमध्ये देखील जे भाजपाचे लोक सहभागी आहेत, त्यावरून देखील पडदा हटवला जाईल. या सर्वांना घाबरूनच ते हे सरकार पाडू इच्छित आहेत. असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर केला. ज्योतिरादित्य सिंधिया हे तरुण नेतृत्व आहे. कायम डावलले गेल्याने सिंधिया हे नाराज झाले होते. आता ते पुढे काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.