मुंबई – देशात डिजीटल पेमेंटचे प्रमाण वाढत असून येत्या काहीं वर्षात म्हणजेच सन 2025 सालापर्यंत देशातील डिजीटल पेमेंटचे प्रमाण 71.7 टक्क्यांवर जाईल असा निष्कर्ष एका अहवालात मांडण्यात आला आहे.
एसीआय वर्ल्डवाईड नावाच्या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की डिजीटल व्यवहारांचे प्रमाण वाढत गेल्याने सन 2025 पर्यंत धनादेश किंवा रोखीने केवळ 28.3 टक्के इतके पेमेंट होणार आहे. डिजीटल पेमेंटच्या बाबतीत भारत हा चीनच्याही पुढे गेला आहे. सन 2020 मध्ये भारतात 25.5 अब्ज व्यवहार डिजीटल पेमेंट सिस्टीम मध्ये झाले आहेत तर चीन मध्ये हे प्रमाण 15.7 अब्ज इतकेच आहे. सन 2020 या वर्षात भारतात इन्स्टंट पेमेंटचे प्रमाण 15.6 टक्के इतके होते, इलेक्ट्रॉनिक पेमेंटचे प्रमाण 22.9 टक्के इतके होते तर 61.4 टक्के पेमेंट चेक किंवा रोखीने झाले आहे. सन 2024 मध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंटद्वारे व्यवहारांचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होईल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.