नवी दिल्ली – बागेश्वर धामचे बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पाटणा येथे सुरु केलेल्या हनुमंत कथेचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. यावेळी शास्त्री यांनी मध्यरात्री पाटण्यातच दिव्य दरबार भरवला. यावेळी सर्वसामान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मध्यरात्री देखील प्रत्येकाने बाबांना भेटण्यासाठी प्रयत्न करत दरबारात हजेरी लावली.
यावेळी बाबांनी भक्तांमध्ये विभूतीचे देखील वाटप केले.पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पटना गांधी मैदान परिसरात असलेल्या त्यांच्या हॉटेल पनाशमध्ये प्रतिष्ठित लोकांसाठी दिव्य दरबार आयोजित केला होता. यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या भक्तांची हॉटेलजवळ गर्दी होऊ लागली. याच कारणामुळे रात्री बाबा हॉटेलमधून बाहेर आले आणि रस्त्यावरच दरबार सुरु केला. मंगळवारी मध्यरात्री देखील असच घडलं. भक्तांची गर्दी पाहून बाबानी दरबार सुरु केला.
आपल्या कथेतून शास्त्रींनी जमलेल्या भक्तांना उपदेश केला. मी जीव पणाला लावून लोकांना जागे करण्यासाठी आलो आहे.असं म्हणत त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठीचे विचार मांडत भक्तांना प्रेरित केले.
पटण्यातील गांधी मैदानात हनुमंत कथेसाठी बाबांना परवानगी मिळाली नाही. असे असतानाही त्यांच्या हॉटेलजवळील गांधी मैदान परिसरात भाविकांची गर्दी होत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना घाम अक्षरशः फुटला. बेशिस्त भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगळवारी रात्रीही बॅरिकेडिंग करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतल्याचे समजते.