Devendra Fadnavis : राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मनोज जरांगे यांची वाशीमध्ये जाऊन भेट घेत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर त्यांनी हे सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार असल्याचे म्हटले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्याने आनंद झाला असल्याचे म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी मनोज जरांगेचे अभिनंदन केले. तसेच सरकारच्या या अध्यादेशामुळे ओबीसी समाजातील बांधव चिंतेत असतील तर मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो कि ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाही,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पुढे उपमुख्यमंत्र्यांनी “राज्यातल्या सगळ्या समाजाला न्याय देण्याचा आजच निर्णय असल्याचे म्हणत कुठल्याहची प्रकारे अन्याय होईल असे निर्णय घेणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.