Devendra Fadnavis – बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांच्यासह सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद दे, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री. विठ्ठलाच्या (Shri Vitthal Rukmini) चरणी घातले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची (Shri Vitthal Rukmini) कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) व अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सर्वश्री रणजीतसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस यावेळी म्हणाले की, “भागवत धर्माची पताका पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. धर्मावर कितीही आक्रमणे झाली तसेच संकटे समोर आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही, त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली.
महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, असे त्यांनी सांगितले.
मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देशही यावेळी फडणवीसांनी दिले.
नाशिकच्या बबन व वत्सला घुगे यांना पुजेचा मान….
नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून यंदा निवड करण्यात आली. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे.
या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान 12 तास लागत होते तर योग्य नियोजन करून कार्तिकी यात्रेला हा कालावधी आठ ते नऊ तासापर्यंत आलेला आहे अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी दिली.