मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी विरोधकांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. तसेच सभागृहात देखील महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सीमावादावरून महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीका केली होती. त्याच टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
सीमावादावरून भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका करत,“सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत असून दडपशाहीने वागवंल जात आहे. यापेक्षा महत्त्वाचं काम काय असणार. सरकारने बाकीचं कामकाज बाजूला सारुन मराठी बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडावी आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठी बांधवांच्या पाठीशी आहे हे कर्नाटकला दाखवलं पाहिजे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं आणि संयम पाळण्यास सांगितलं होतं. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात, हे आपण उघड्या डोळ्याने पाहायचं का?,” अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली.
दरम्यान, भास्कर जाधव यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. भास्कर जाधव यांना उत्तर देताना “या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालावी लावेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही. जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच लढू. केंद्रात, सर्वोच्च न्यायालयात आपण मराठी बांधवांवरील अन्याय दूर करण्यासाठी हवं ते करु,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना, “मागील आठवड्यातील वातवारण गंभीर असल्याने ठराव येऊ शकला नाही. आज ठराव येणार होता, पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होत. त्यासाठी जाणं महत्त्वाचं होतं. ते दुपारी येणार आहेत. ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही,” असे आश्वासन त्यांनी विरोधकांना दिले.