वेल्हे तालुक्यात विकासासाठी ग्रामस्थांची प्रशासनाकडे आर्त मागणी
वेल्हे – खानू (ता. वेल्हे) हे गाव अतिदुर्गम, डोंगराळ भागातील सह्याद्रीच्या कुशीतील कडेकपरात वसलेले असून, या गावाची लोकसंख्या पूर्वी पाचशेच्या घरात होती;परंतु आता केवळ दोनशेच्या घरात आहे. हा आकडा घसरण्याचे कारणही तसेच आहे. ओसाड पडत चाललेल्या गावातील नागरिकांच्या व्यथा ऐकून मन सुन्न होते.गावात विकासाची गंगा येणे तर दूरच; परंतु तिचा सुगंधसुद्धा येथे दरवळलेला नाही.
गावातील विद्यार्थ्यांना आजही रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागत आहे. रॉकेलही मिळत नसल्याने चुलीवरच्या मिणमिणत्या उजेडात प्रकाश करून रात्र काढावी लागत आहे. गावाच्या बाजूने जंगल असल्यामुळे हिंस्र प्राण्यांचे भय मोठ्या प्रमाणात आहे. आजतागायत कोणत्याच सुविधा मिळालेल्या नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
खानू गावात पोहचण्यासाठी रस्ता नाही. येथील नागरिकांना कोसो दूर पायपीट करावी लागत आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने कोणी आजारी पडले तर उपचाराआधीच कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक वेळेस नेते मंडळी फक्त आश्वासन देते आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणीही सुविधा देण्यासाठी धजत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
सध्या या गावाची स्थिती अत्यंत बिकट आहे. या भागांत दोन वर्षांपासून शाळेचे बांधकाम ढासळले असून शाळा बंद पडली आहे. वाहन येण्याचा कोणताच मार्ग नसल्याने कोणी आजारी पडले तर झोळीत टाकून कोसो मैल पायपीट करत मुख्य रस्त्याला आणावे लागते. या प्रवासात कित्येकांनी आपले प्राण सोडले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी घरकुल योजना पोहोचली आहे; परंतु येथील नागरिकांनी मागणी करूनही योजनांचा लाभ मिळाला नाही. कोणी विकासगंगा खानू गावात आणणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. खानू गावावर मुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी लक्ष देऊन रस्ता, वीज द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.