पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील शरद पवार हे लिहिलेले स्क्रीप्ट वाचतात. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली असून, राज्यातील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांसारख्या एखाद्या पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने बोलायला हवे आहे.
जबाबदार लोकांचे हे पोरकट वक्तव्य असल्याची टीका पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. पवार यांनी मंगळवारी पुण्यात बारामतीसह जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर ते बोलत होते.
राज्य शासनाने जरांगे पाटील यांच्याबाबत नेमलेल्या एसआयटीबाबत पवार म्हणाले, जरांगे पाटील व माझा संबंध विचारला, तर उपोषण सुरू झाल्यावर सर्वांत आधी मी गेलो होतो. त्यांच्या मागण्यांबाबत बोललो. मात्र, त्याच वेळी दोन समाजांत तेढ निर्माण होणार नाही.
सामाजिक एकोपा टिकावा, इतर समाजाबाबत कटूता येणार नाही याची काळजी घ्यावी, इतकाच आमचा संवाद झाला होता. त्यानंतर आजअखेर माझा त्यांच्याशी संवाद झालेला नाही. त्यामुळे एसआयटी नेमा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमून चौकशी करा. कर नाही त्याला डर कशाला. आमचे फोन रेकाॅर्ड तपासा. तसेच त्यांचेही तपासा, असे आव्हान पवार यांनी दिले आहे.
…तर सरकारवर कोण विश्वास ठेवेल?
मजोर जरांगे पाटील यांच्याप्रकरणात भाजपने विधानसभेत माजीमंत्री राजेश टोपे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यावर पवार यांनी राज्य शासनाच्या कार्यपद्धतीवरच टीका केली. जरांगे यांच्या आंदोलनप्रकरणी सरकारकडून टोपे यांची मदत घेतली जात होती. याची मला माहिती आहे. मात्र, आता आदर करण्याऐवजी त्यांनीच जरांगे यांना मदत केली, म्हणून सरकार प्रहार करत आहे. त्यामुळे भविष्यात राज्य सरकारवर कोण विश्वास ठेवेल? असे सांगत टोपे यांच्यावरील आरोपही बिनबुडाचे असल्याचा दावा पवार यांनी केला आहे.