नवी दिल्ली – राज्यसभेच्या खासदारांनी मंगळवारी केंद्र सरकारमध्ये रिक्त असलेली आठ लाखांहून अधिक पदे त्वरीत भरण्याची जोरदार मागणी केली. देशातीाल बेरोजगारीचा दर उच्च स्तरावर असताना ही पदे रिक्त ठेवणे अन्यायकारक आहे असे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला सांगितले.
शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना, व्ही विजयसाई रेड्डी म्हणाले की, सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रिक्तपदे ठेवली गेली आहेत आणि देशात दुसरीकडे बेरोजगारीचा मुद्दा उग्र बनला आहे.अधिकृत आकडेवारीनुसार, केंद्र सरकारमध्ये सुमारे आठ लाख पदे रिक्त आहेत, ज्यात सशस्त्र दलातील एक लाख आणि रेल्वेमध्ये दोन लाख पदे आहेत असेही त्यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिले.
सरकार रिक्त पदांबाबत नीट माहिती देत नाही आणि ती पदे भरण्यासाठी योग्य कार्यवाहीही सध्या करीत नसल्याचे निदर्शनाला येत आहे असे ते म्हणाले. रिक्तपदांसाठी ज्या परिक्षा मध्यंतरी घेण्यात आल्या त्याचे पेपर फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे त्यामुळेही परिक्षार्थींना मनस्ताप सहन करवा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
मार्क्सवदी कम्युनिस्ट पक्षाचे व्ही शिवदासन म्हणाले की, विविध मंत्रालयांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सशस्त्र दलात 1लाख 25 हजार 555 पदे, रेल्वेमध्ये 2 लाख 65 हजार 547 रिक्त आहेत. राजपत्रित स्वरूपाची 80,752 पदे रिक्त आहेत असेही त्यांनी सांगितले. त्यांनी ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली.
एलजेडी पक्षाचे एमव्ही श्रेयम्स कुमार यांनीही या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. ते म्हणाले की डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांवर पोहोचला आहे आणि केंद्र सरकारमध्ये आठ लाख पदे रिक्त आहेत ही बाब भूषणावह नाही.