देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथील नगरपंचायत कार्यालयाची सध्या असलेली इमारत छोटी आहे. नवीन इमारतीचे बांधकाम होईपर्यंत शासकीय असणारे भक्त निवासच्या इमारतीमधील काही भाग कार्यालयासाठी उपलब्ध झाल्यास आगामी कामकाज करणे सोयीस्कर होईल, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानोबा काळोखे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत देहूचा विकास सुरू आहे. देहूच्या लगत तळवडे तर जवळच असणाऱ्या तळेगाव, चाकण हे भाग औद्योगीकरण (एमआयडीसी) असल्याने, पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक व उद्योग नगरी तसेच 27 किमी अंतरावर विद्येचे माहेर असणारे पुणे शहर असल्याने तीर्थक्षेत्र देहू मध्यवर्ती ठिकाण बनल्याने देहूचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. चाकरमान्यांसह वास्तव्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने सतरा सदस्यांची असणारे मोठी ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या देहू ग्रामपंचायतीचे 8 डिसेंबर 2020 रोजी नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले.
तीर्थक्षेत्र देहू हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि योगभूमी असल्याने वर्षातून तीन वेळा मोठ्या यात्रा भरतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक यात्रांसाठी येतात. प्रतिदिन मुख्य मंदिरातील दर्शनासाठी हजारो भाविक येतात. पीएमपीएलची सेवा लगतच पाच किमी अंतरावर असणारे लोहमार्ग सेवा यामुळे परिसराचा विस्तार व डोलारा वाढत आहे.
नगरपंचायतीचे कामकाज तसेच कारभार पाहण्यासाठी विविध समित्या, विभाग शाखा, मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी, अभियंता, खोल्या, स्वच्छतागृह यासह विविध खोल्यांसह वाहनतळ असणारे भव्य इमारतीची आवश्यकता आहे. नवीन इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूरही झाला आहे. हे कार्य पूर्ण होण्यास बराच काळ लागणार आहे. शासकीय भक्त निवास उभारले आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये भक्त निवास येथे नगरपंचायत कार्यालय उभारल्यास कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल.
प्रशासनाची होतेय दमछाक
हनुमान समाज मंदिराच्या वर सुमारे दोन हजार चौरस फुट जागेमध्ये पूर्वीची असलेली ग्रामपंचायत कार्यालय आहे. कमी कर्मचारी संख्या आणि अपुऱ्या जागेतही तात्कालीन ग्रामपंचायतीचे कामकाज पाहत होते. मात्र, वाढत्या डोलारामुळे नगरपंचायतीची सध्या असलेली कर्मचारी संख्या ही तोकडी आहे. अभियंता, अग्निशमन पथक यासह सध्या असणारे अपुरे कर्मचारी, कचरा वाहतूक करण्यासाठी पुरेशा घंटागाड्या नाहीत, ट्रॅक्टर तर नगरपंचायतीकडे उपलब्ध नसलेले अग्निशमन वाहन, जेटिंग वाहन, विद्युत पोलचे पथदिवे दुरुस्ती करण्यासाठी शिडी वाहनांसह इतर वाहने तसेच विविध समस्यांमुळे नगरपंचायतीचे कारभार सांभाळताना प्रशासनाची दमछाक होते आहे.