पुणे: मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या सहा महाविद्यालयांतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मराठवाडा मित्रमंडळ संस्थेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, वाणिज्य महाविद्यालय, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, कॉलेज ऑफ फार्मसी, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सहा महाविद्यालयांतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच, सामाजिक कार्यकर्ते व `आपले घर`चे संस्थापक विजय फळणीकर यांना एक लाख रुपये रोख व मानपत्र यासह `मराठवाडा मित्रमंडळ सेवाव्रती पुरस्कार` देऊन गौरवण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गणगे, कार्याध्यक्ष प्राचार्य बी. जी. जाधव, सरचिटणीस किशोर मुंगळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षणाचा उपयोग करून स्वतःचे आयुष्य समृद्ध करतानाच सेवाव्रती व्हा, असा संदेश डॉ. फणसळकर यांनी दिला. त्या म्हणाल्या, “ शिक्षण, यश, कर्तृत्व हे केवळ आपले नसते, तर आपल्या भोवतीच्या सर्वांचे असते. त्याची जाणीव ठेवून आपल्या आयुष्याला आकार द्यायचा असतो. त्यासाठी स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठीही धडपड करा. एखाद्यावेळी अपयश आले, तरी त्यातून शिका आणि पुढे जा. आयुष्याचे ध्येय ठरवून त्या दिशेने चालत राहिला तर आयुष्य समृद्ध होईल. “
डॉ. विद्यासागर यांनी विद्यार्थ्यांसमोर मुक्तचिंतन मांडताना स्व-मार्ग शोधण्याचे आवाहन केले. सरधोपट मार्गाऐवजी अनवट वाटांवरून चालला तर अधिक आनंद व अधिक यश मिळवू शकाल, असा मंत्रही त्यांनी दिला. स्वभावात लवचिकता ठेवा, स्वजनसंग्रह करा, संकुचितता सोडा, स्वावलंबी व्हा, स्वहिताचा प्रथम विचार करा अशा जीवनात यशस्वी होण्याच्या `टिप्स`ही डॉ. विद्यासागर यांनी दिल्या. श्री. फळणीकर व प्राचार्य जाधव यांचीही भाषणे झाली. प्रा. प्रदीप तामखेडे यांनी आभार मानले. प्रा. संकेती शिरोळे व प्रा. रेवती नाईक