हैदराबाद – मेळघाट व्याघ्र प्रकरल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ताबडतोब सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर समित्या स्थापन करण्याचे सरकारने ठरवले आहे. यासंदर्भात खास परिपत्रक काढण्यात आले आहे.
RFO दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यासह देशभरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी उपवनरक्षक DFO विनोद शिवकुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी घटना आपल्या राज्यात घडू नये यासाठी तेलंगणा सरकारने वन विभागातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष समित्या नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगणा सरकारच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आर. शोभा यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत वनविभागात महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या वाढली आहे. त्यांना रात्री दूर जंगलात गस्त घालावी लागते. त्यामुळे ड्युटीसोबत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी आणि महिलांच्या तक्रारी ताबडतोब सोडविण्य़ासाठी विशेष समित्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात एक खास परिपत्रक देखील काढण्यात आले आहे.
त्यानुसार, वनपरिक्षेत्र (Range), विभाग (Division), जिल्हा (District) आणि सर्कल (circle) या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांमध्ये विशेषत: वरिष्ठ महिला अधिकारी\ स्टाफ असणार आहे. या समित्यांमार्फत महिलांचे प्रश्न ताबडतोब सोडविण्यात येणार असल्याचे आर. शोभा यांनी सांगितले.