बाळू सांग बरं तुझे वडील काय काम करतात?’ बाळू म्हणाला, “सर ते कामाला जातात’. “तुषार तू सांग तुझे वडील काय करतात?’ तुषार म्हणाला, “सर पप्पा ऑफिसला जातात.’ मुलींकडे वळत, सरांनी पुन्हा हाच प्रश्न शर्वरीला विचारला, “सांग तू?’ शर्वरी म्हणाली, “सर डॅडी आय टी इंजिनिअर आहेत.’ अनंतला सरांनी विचारले, तो म्हणाला, “बाबा शिक्षक आहेत.’ मागच्या बाकावरील आशाला सरांनी विचारले, “हं सांग तू… तूच इकडे तिकडे काय पाहतेस, आशा सांग तू,’ ती म्हणाली, “मला वडील नाहीत. आई रोज सकाळी धुणी भांडी करायला जाते व नंतर कामाला जाते.’
एक एक करून सरांनी सर्व मुलांना प्रश्न विचारले व जाणून घेतले की कुणाचे आईवडील काय करतात.
सरांनी मुलांना सांगायला सुरुवात केली. मुलांनो कामावरील निष्ठा फार महत्त्वाची असते. काम, सेवा ह्या गोष्टी एकच आहेत, पण कोण कुठे काम करतो व कशा प्रकारचे करतो त्यावरून त्यांना सर्वजण वेगवेगळी नावे देतात. प्रत्येकाच्या कामाचे मूल्य तेवढेच अमूल्य असते. कारण समाजातील प्रत्येकाच्या कामाची मदत सर्वांना होत असते, कारण आपण समाजप्रिय माणसे आहोत. एकमेकांना मदत करत असतो. फरक एवढाच की काही जण कष्टाची, अंगमेहनतीची कामे करतात तर काही जण बुद्धीची कामे करतात. यात शिक्षणाचा व कौशल्याचा भाग असतो व त्यावरून त्यांचे काम ठरते व त्यांना वेगवेगळा मोबदला मिळतो. यालाच कोण रोजगार तर कोण पगार म्हणतो.
सेवेत दररोजची शाश्वती असते. वयाच्या ठराविक मर्यादेपर्यंत सेवा करावयाची असते तर काहींमध्ये दररोज काम मिळते की नाही याचीही शक्यता नसते. इमारत बांधकामावर बिगारी काम करतात, काहीजण खड्डे खोदणे, माती उचलणे, काहीजण शेतावर जातात तर शहरात काही लोक मजूर अड्ड्यांवर कामाच्या शोधात उभे असतात. सकाळी, सकाळी समाजातील प्रत्येकाने कामावर जाणाऱ्यांना पाहा. हातात डबा घेऊन कंत्राटदार कामाला नेतो का याची वाट पाहात असतात. याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे.
आपण एका वर्गात समान आहोत, तसेच एकाच प्रकारचा अभ्यास करतो, तसेच सर्वांचे आईवडील प्रत्येकाला तेवढेच प्रेम करत असतात. कामाच्या याच पायऱ्या प्रत्येकाला आनंद देत असतात. ज्यांना नोकरी आहे, त्यांनी काम करण्याच्या भावना जाणून घेतल्या तर त्यांना त्यांच्या सेवेत आनंद मिळतो. कामाच्या पायऱ्या जर केल्या तर असे म्हणता येईल, काम, सेवा, त्याग, समर्पण आणि आनंदी आयुष्य म्हणून केलेल्या कामाला, सेवेला त्यागाची जोड दिली तर समर्पणाची भावना निर्माण होते व आयुष्यांचा परमानंद घेता येतो व आयुष्य आनंदी करता येते.
आपल्या महाराष्ट्रातील अनेक नामवंतांनी आपल्यासमोर त्यांच्या कार्यातून सेवेचे मापदंड तयार करून ठेवले आहेत. आपणास दिशा मिळतील अशा सेवेच्या पायऱ्या आहेत. भागवत संप्रदायातील अलंकापुरी (आळंदी)तील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या दारात हैबतबाबांची पायरी आहे. या पायरी पूजनाने दरवर्षी ज्ञानोबांच्या संजीवन समाधी सोहळ्यास व पायी वारीस सुरुवात होते. भाकरी आणि भाजीवर राजी असणाऱ्या पांडुरंगाच्या दारात संत नामदेवांची पायरी आहे. तर साहित्य देवतेची पायरी पुण्यातील साहित्य परिषदेच्या दारात म. श्री. दीक्षित यांच्या नावाने आहे व चौथी पायरी सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या राजगडावर आहे.
रायगडाचे बांधकाम पूर्ण झाले आणि शिवरायांनी ज्यांनी या गडाचे वास्तुविशारद म्हणून काम पाहिले व गड बांधून घेतला व आपल्या स्वराज्याप्रती आपली सेवा रुजू केली. त्यांना रायगडावर योग्य त्या ठिकाणी आपले नाव लिहा असे सांगितले. तेव्हा त्यांनी महाराजांना नम्रपणे नकार दिला. परंतु महाराजांच्या आग्रहास्तव ते नाव लिहायला तयार झाले. ते ठिकाण होते जगदिश्वराच्या मंदिराची पहिली पायरी. कारण त्यांची तशी इच्छा होती, या मंदिरात जेव्हा शिवराय येतील तेव्हा त्यांचे उजवे पाऊल त्या पायरीवर पडेल त्यावेळी तो आमच्या पिढ्यांच्या मस्तकावरील आशीर्वाद असेल ही भावना त्यामागे होती. सेवेची ठायी तप्तर, हिरोजी इंदलकर याला म्हणतात सेवा आणि सेवेप्रती असलेले समर्पण!
अनिल गुंजाळ
सर लेख अप्रतिम आहे. कोणत्याही प्रकारची सेवा समर्पण भावनेने करणे महत्त्वाचे आहे. अशा सेवेचे मोल होत नाही
आपण खूप छान उदाहरण दिली आहेत.