नवी दिल्ली – यावर्षी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावे लागले आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरील कर्जाची रक्कम 101.3 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. मार्च 2020 अखेर कर्जाची रक्कम 94.60 लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षी जून अखेर भारत सरकारवर 88 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते.
यावर्षी लॉकडाऊनमुळे केंद्र सरकारच्या महसुलावर परिणाम झाला आहे. जीएसटीचे कर संकलन कमी झाल्यामुळे केंद्र सरकारला राज्यांची नुकसानभरपाई देता आलेली नाही. यासाठी केंद्र सरकारने राज्यांना कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे.
या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट साडेतीन टक्के गृहीत धरले होती. मात्र, ती तूट आता दुप्पट होण्याची शक्यता आहे. या खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागले आहे. त्याचबरोबर आगामी काळातही कर्ज घ्यावे लागणार असल्याचे दिसून येते.