-सत्येंद्र राठी
20 सप्टेंबर हा दिवस Wife Appreciation Day अर्थात् “पत्नी प्रशंसा दिवस’ म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने…
एक माणूस कित्येक महिने सारखा कोमात जात होता. अशा वेळी त्याची पत्नी दिवसरात्र त्याच्या पलंगापाशी बसून असायची. एकदा त्याला काही वेळ शुद्धी आली असताना, त्याने आपल्या पत्नीला खुणावून जवळ बोलावले. ती जवळ आल्यावर तो म्हणाला, एक विचार राहून राहून मनात येतो की, माझ्या आयुष्यातील सर्व वाईट परिस्थितीमध्ये तू माझ्यासोबत राहिलीस. मला नोकरीवरून काढून टाकलं गेलं तेव्हाही तू होतीस. माझा धंदा बुडाला तेव्हाही तू होतीस. मी गोळी लागून जखमी पडलो तेव्हा आणि कोर्ट कचेऱ्याच्या भांडणात जेव्हा मी आपलं घर गमावून बसलो तेव्हाही तू सोबत होतीस. आता माझी तब्येत बिघडत चालली आहे तर इथंही तू आहेस. हे सगळं बघून मला तर असं वाटतयं की माझ्या आयुष्यात तू नसतीस तर दुःखाचे एवढे डोंगर आलेच नसते. गमतीचा भाग वगळला तर भारतीय समाजव्यवस्थेत पत्नीची जागा किती अनिश्चित, किती दोलायमान आहे हे समजण्यासाठी वरील गोष्ट पूरक ठरावी.
…सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी.
विंदाच्या या ओळी इथं आठवतात.
…कार्येषु मन्त्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रम्भा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा।।
…अर्थात प्रसंगकार्यात मंत्री, तर गृहकार्यात दासी, भोजन बनविताना माता, काम सुख देताना रंभा, आचारणात धर्मानुकूल तर पृथ्वीसारखी क्षमाशील अशी सहा गुण असलेली पत्नी मिळणे दुर्लभच. असे मानले जात असे असले तरी या बिरुदाप्रमाणे अभिप्रेत सन्मान पत्नीच्या वाट्याला आल्याचे दिसून येत नाही.
खरं तर पत्नीच्या भूमिकेचा पल्ला फार मोठा आहे. त्यात ती अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते; पण पत्नी म्हणून तिला दुसरे काही येत नाही म्हणूनच ती हे सारे करत आहे. असा समज समाजात आजही आढळतो.घर सांभाळणे, जेवणखाणची व्यवस्था करणे, घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे, नातेसंबंध जोपासणे, आल्यागेल्याची बडदास्त ठेवणे, मुलांच्या शिक्षण, संस्कारांवर नजर ठेवणे,शेजारीपाजाऱ्याशी जुळवून ठेवणे, व्रत वैकल्याची बुज राखणे, लवकर उठणे, शेवटी निजणे, संकटकाळी पतीच्या पाठीशी उभे राहणे अशा कित्येक आघाड्यांवर समतोल साधत ती कार्यरत असते. पत्नी म्हणून ती करत असलेल्या कामाची तुलना कशाशीही होऊ शकेल, असे वाटत नाही.
जगण्यातील प्रत्येक कमतरता आपल्या कसबने ती भरून काढत असते; पण नवरा कमवून आणतो या त्याच्या एकमात्र जमेच्या बाजूला उचलून धरत पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने पत्नीच्या कर्तृत्वाला नेहमीच निम्न स्थान दिले. पुरुषी अहंकार असो किंवा तिचा स्वतःचा सोशीकपणा, तिचे नाव श्रेयनामावलीत कधीच लिहिले गेले नाही. तिने नऊ महिने उदरात वाढविलेल्या अपत्याची ओळखही पतीच्या नावाने दिली जाते, यावरून आपण काय ते समजू शकू. खरं तर पती शब्दाचा अर्थच… ताब्यात ठेवणारा. त्यामुळे धनी, स्वामी, मालक, भ्रतार असे अनेक समानार्थी शब्द आणत पती पत्नीवर अधिकार सिद्ध करत गेला.
पत्नीच्या भावनिक बाजूपेक्षा पतीची व्यावहारिक बाजू जास्त वरचढ ठरविली गेली. याचाच फायदा घेत घरगुती हिंसाचारापासून, लैंगिक शोषणापर्यंत इतकेच नव्हे, भूतकाळात डोकावले तर पत्नीला सती पाठविण्यातही समाजाने मागे पुढे पाहिले नाही.
खरं तर मानवजातीला सुशोभित करणारी विवाह संस्था टिकविण्याचा निर्विवाद श्रेय तिचाच. कुटुंब ही संकल्पना राबविणे हेही तिच्यामुळेच शक्य झालं; पण तिच्या या कामाचे कधीच कौतुक करण्यात आले नाही. उलट घरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक अप्रिय स्थितीस तिला जबाबदार ठरविण्यात आले. ही अडथळ्याची शर्यत पूर्ण होताना दिसत नसल्याने शेवटी तिने या साऱ्याचा नशिबाचा भाग म्हणून स्वीकार करून घेतला. किती तरी मोठा काळ असाच निघून गेला; पण आता उशिरा का होईना, स्थिती झपाट्याने बदलू लागली. शिक्षणाच्या वाटा उघडल्या गेल्या, तिला तिच्या हक्काची जाणीव झाली, ती झेप घेण्यास सरसावली, तिला आत्मबळ मिळाले, ती आत्मनिर्भर होऊ लागली; पण यात एक गोष्ट चिंतेत टाकणारी ठरली. ती म्हणजे बदललेल्या परिस्थितीत पत्नी या जबाबदारीतून ती स्वतःला मुक्त करू पाहात असल्याची.
आता ती पत्नी, लौकिक अर्थाने गृहिणी होण्यास राजी नाही. तिचा हा निर्णय कुटुंब व्यवस्थेच्या बांधणीस कमकुवत करू शकतो. हे काम आवश्यक असले तरी निरर्थक आहे, असे तिला वाटू लागल्याने ती यापासून फारकत घेत आहे.
हे पाहता पत्नी म्हणून जर ती कुटुंब कक्षेच्या बाहेर निघून गेली तर समाजव्यवस्था डळमळीत होण्यास वेळ लागणार नाही. याचे तीव्र आणि भयंकर असे परिणाम मानवी समाजाला पुढे भोगावे लागतील. पुरुषांकडून पत्नीपदाचा योग्य सन्मान न ठेवल्या गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पती कमावतो आणि जो कमावतो त्याचेच चालते हे कळून चुकल्याने तिनेही तोच मार्ग निवडला. त्यात तिचे चुकले असे म्हणता येणार नाही. तिने केलेल्या समर्पणाचे योग्य मूल्यमापन न झाल्याचा हा परिणाम आहे. पण या साऱ्याने कुटुंबातील एकसंधपणा, जिव्हाळा, आहार व्यवस्था, नव्या पिढीवर करायचे संस्कार इत्यादींची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट होऊ लागली आहे.
हे सर्व सावरायचे असेल तर पती महाशयांना पारंपरिक पतीपण सोडून तिच्याबरोबर सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल. स्वतःचा आणि तिचा दर्जा समान ठेवावा लागेल. तिच्या कामाचा सार्वजनिक आदर व्हायला हवा. तिची प्रशंसा व्हायला हवी. खरं तर तिच्या कामाची मोजदाद अशक्यच, पण ज्याचे मूल्यमापनही करता येणार नाही, असे अत्युच्च स्थान पत्नीला द्यायला हवे आणि हे सारे देण्याची हीच वेळ आहे, अन्यथा पुढे खूप उशीर होईल.