कधी कधी आपल्याला आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात, विश्वास बसत नाही अशा. परवा माझ्या एका मैत्रिणीने व्हीडिओ टाकला होता व्हॉट्सऍपवर. तिच्या खिडकीमध्ये गजांवर रोज दोन कावळे येऊन बसतात आणि चक्क तिच्या हातानी खाऊ खाऊन पोट भरल्यावर निघून जातात. हे रोजचच आहे. न चुकता ते त्या वेळेवर बरोबर येतात आणि खाऊ द्यायला उशीर झाला की वेगळाच आवाज काढून कल्ला करतात. माझ्या बहिणीच्या घरीही असेच दोन कावळे येतात. त्यांना शेव, भेळ, भजी आवडतात. पोळी, भात दिला तर खात नाहीत. रोज ठराविक वेळेला येऊन हाका मारल्यासारखे आवाज काढतात. वेगळाच लाडिक आवाज!
खाऊ खाऊन झाला की उडून जातात. दुसरी एक मैत्रीण आहे तिच्या वहिनीच्या घरी बरोबर 10 वाजता दोन चिमण्या येतात आणि मुगाची भजी खाऊन जातात. त्यांच्यासाठी तरी तिला मूग भजी करावीच लागतात. आमच्या घरीही माझ्या लेकीला प्राचीला एक छोटं साळुंकीचं पिल्लू सापडलं होतं झाडाखाली पडलेलं. ते घरी आणलं खाऊ पिऊ घालून ते मस्त तरतरीत झालं. घरात फिरे सगळीकडे; पण कधी उडून गेलं नाही. मुलांच्या खांद्यावर, बोटावर बसे. मजेत राही नंतर नंतर तर घरातल्या फोनच्या मोबाइलच्या रिंग टोनचा आवाज तंतोतंत काढी. बाहेर कावळे आले की कावळ्यांचा मांजराचा, कुत्र्याचा आणि घरातील माणसांच्या हसण्याचा आवाज आला की तोही आवाज काढी. पोळी भाकरीचे तुकडे, बिस्किटे हवेत उंच उडवले की झेप घेऊन बरोबर झेलून खात असे. माझ्या छोट्या मुलीचा त्याला जास्तीच लळा होता. ती दिसली की अगदी मोरासारखा अंग थरथरवून नाच करी आणि मग तिच्या खांद्यावर जाऊन बसे. ह्या पक्ष्यांना राग, लोभ, प्रेम, रुसवे फुगवे, सगळं काही व्यक्त करता येतं अगदी माणसांसारखं. कुत्र्याला मुलासारखं बेटा बेटा करून मायेनं वाढवणारी माणसंही आहेत. अगदी त्यांच्यासाठी वेगळं घर, डॉगफूड, डायपर, कपडे, साबण, पावडर, स्वेटर, बूट, टोप्या, गॉगलपर्यंत हौसेने आणणारे.
परवा मी माझ्या लेकीकडे प्राचीकडे गेले होते. तिथे गॅलरीत तिची चाहूल लागली रे लागली की जवळ जवळ 50/60 चिमण्या एकाचवेळी येऊन चिवचिवाट करतात आणि वाटीभर तांदूळ 2 मिनिटात सफाचाट करून निघून जातात. तिच्या गॅलरी समोर शेत आहे आणि झुडपं भरपूर आहेत पण तिची चाहूल लागता क्षणी येतातच आणि तिला अजिबात घाबरत नाहीत. फक्त तिच्या अंगाखांद्यावर खेळायच्याच बाकी आहेत. मात्र मला पाहून सगळ्याच्या सगळ्या उडून गेल्या. आहे की नाही आश्चर्यमिश्रित गंमत! दिवसातून जेव्हा जेव्हा ती गॅलरीत जाते तेव्हा तेव्हा त्या येतातच तांदूळच खायला. भात भाकरी नाही खात. असं म्हणतात माणसं काय किंवा पक्षी प्राणी काय माणसांच्या आयुष्यात उगीच नाही येत. काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय! हे ऋणानुबंधच जवळही आणतात आणि कार्यभाग संपला की दूरही नेतात… वियोग घडवतात. माझी आई नेहमी म्हणते, आपल्या अवती भवती सगळे आपले पूर्वजन्मीचे काही घेणेकरी आणि काही देणेकरी असतात. काही काही सौख्य देण्यासाठी तर काही सुडकरी सूड घेण्यासाठी येतात. काही ऋण चुकवण्यासाठी तर काही वसूल करण्यासाठी… माणसेही आणि पशुपक्षीही…
अनुराधा पवार