पुणे – “साहित्य संमेलनात राजकारण्यांच्या सहभागावरून होणारा वाद निरर्थक आहे. साहित्य हे समाजातील विविध घटना आणि प्रसंगातूनच निर्माण होत असते. त्यामुळे राजकारण, समाजकारण आणि साहित्य हा त्रिवेणी संगम साधत भविष्यात वाटचाल झाली पाहिजे,’ असे मत महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित यंदाच्या 21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. दीक्षित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि.दा. पिंगळे उपस्थित होते.
“लोकसाहित्याच्या बदलत्या प्रवाहांचा आढावा घेत लोकसाहित्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जगण्यातील सहजता हे लोकसाहित्याचे मुख्य सूत्र आहे आणि विविध विधी, परंपरा, श्रद्धा हा लोकसाहित्याचा गाभा आहे,’ असे डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या.
सासणे म्हणाले, ‘अनेक युगांच्या प्रवासानंतर आपण आता भ्रमयुगात प्रवेश केलेला आहे. या भ्रम युगामुळे अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झाले असून त्या मूळ प्रश्नांवर काम करावे लागणार आहे.’
यावेळी बाबा जाधव, विलास पंढरी, बाळासाहेब गिरी, विजय पानवलकर, शैलेश त्रिभुवन, के.डी. पवार, संभाजी चौगुले यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. दिलीप बराटे प्रास्ताविक तर वि.दा.पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.