शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ः शेतीकामे रेंगाळली
मंचर- लौकी (ता. आंबेगाव) येथे दिवसाही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने शेतीकामे रेंगाळली आहेत. तरकारी मालाची खुरपणी करणे, तसेच शेती पिकांना पाणी देणे इत्यादी कामे रखडली आहेत. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी पांडुरंग नाना थोरात व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झालेले मेंढपाळ राजेंद्र सुळे यांना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे वाटप करण्यासाठी कळंब-राणूबाई मंदिरमार्गे मधलामळा येथे बाळासाहेब कानडे व संतोष थोरात हे चारचाकी गाडीतून चालले होते. काळपट्टी येथे किराणा वस्तूंचे वाटप करून ते मधला मळ्यात राहणारे शिक्षक संतोष थोरात यांना घरी सोडण्यासाठी निघाले. गाडी वीस ते पंचवीस फुट पुढे गेली असता पश्चिमेकडील रस्त्याकडेच्या दाट झाडीतून एक पूर्ण वाढ झालेला अंदाजे दोन ते अडीच फूट उंच असलेला बिबट्या रस्त्यावर आला.
गाडी जवळ येताच बिबट्या रस्ता ओलांडून पूर्वकडे निघून शेताच्या बांधावर जाऊन उभा राहिला. गाडी थांबवली असता काही क्षणभर बिबट्या गाडीकडे पाहत उभा होता. त्यानंतर गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकताच तो उसाच्या शेतात निघून गेला. त्याचवेळी तुळशीराम पारधी व श्रीकांत थोरात हे कालव्यानजीक बाजरीचे राखण करत होते.सायंकाळी बिबट्या कालव्याच्या पूर्वेकडील रस्त्याने भैरवनाथ मंदिर असलेल्या डोंगराकडे जाताना दिसला. बिबट्या दिसताच ते दोघे भयभीत होऊन घराकडे निघून गेले.
वारंवार होणारे दिवसातील विजेच्या भारनियमनामुळे अंधाऱ्या रात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अशा वेळी बिबट्याने हल्ला केल्यास अनुचित प्रसंग घडल्याशिवाय राहणार नाही. यावर उपाय म्हणून वीज महामंडळाने भारनियमनात बदल करावा. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी पांडुरंग थोरात, शंकर थोरात, राजाराम थोरात, पोपट थोरात, देवराम थोरात, रामचंद्र थोरात आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.