कुरकुंभ(प्रतिनिधी) – राज्यातील 60 हजार शिक्षकांना 100 टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्यावतीने सोमवार (दि. 10) पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी (दि. 9) दौंड तालुक्यातील अंशतः अनुदानित, विना अनुदानित आणि अघोषित शिक्षक -शिक्षिकांनी भाजप आमदार राहुल कुल यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. तसेच त्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, व अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवर हजारो शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करीत आहेत. यामध्ये काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी 20 टक्के व 40 टक्के अनुदानानुसार वेतन घेत आहेत. तर काही अघोषित आणि विनाअनुदानित संस्थेकडून देण्यात येणाऱ्या तुटपुंजी पगारावर शिक्षक काम करीत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महिन्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर साधा घर खर्चदेखील भागत नसल्याने राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षक वर्गाचे प्रश्न सोडवून पूर्वीच्या प्रचलित धोरणानुसार वेतन मिळण्याची मागणी दौंड तालुक्यातील अनुदानित शिक्षक करीत आहेत.
“दौंड तालुक्यातील विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, अघोषित शिक्षक, शिक्षिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत व अधिवेशनात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– अॅड. . राहुल कुल, आमदार दौंड
राज्यातील अद्यापही 21 हजार कर्मचारी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. 13 हजार कर्मचाऱ्यांना 20 टक्के तर 16 हजार कर्मचाऱ्यांना 40 टक्के अनुदान सुरू आहे. राज्यातील या शाळा 100 टक्के अनुदानासाठी पात्र असताना ही शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे नाहीत असे सांगितले जाते. त्यामुळे 100 टक्के अनुदानास पात्र असूनही राज्यातील या 60 हजार कर्मचाऱ्यांना 100 टक्के वेतन मिळत नाही. शासनाने ते सुरू करावे या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.