पुणे – पावसाळ्यात विद्युत अपघातांचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहा, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, महावितरणकडून येत्या 26 जून ते 2 जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहनिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पावसाळ्यात मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचा मुख्य स्वीच बंद करावा व महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी ऍल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरावी. ही फ्यूज तार वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार फ्यूजसाठी वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते, असे महावितरणने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
अशी घ्या काळजी…
- विद्युत उपकरणे, स्वीच बोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये.
- ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत.
- पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये.
- घरामध्ये केलेल्या वायरिंगची स्थिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.
- मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज इत्यादी उपकरणांसाठी थ्रीपिन सॉकेटचाच वापर करावा.
- ओलसर लोखंडी पाइप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी पायात कोरडी रबरी किंवा प्लॅस्टिक चप्पल वापरावी.
- घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा ऍण्टेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर असावेत.
- ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये.
- विजेचे स्वीच बोर्ड किंवा घरातील कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- विशेषतः लोखंडी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात -वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये.