- अधिकाऱ्यांचे आणखी एक आश्वासन
- 437 कोटी महसुली व भांडवली खर्चाची तरतूद
पिंपरी – शहराचा पाणीपुरवठा अतिशय महत्त्वाचा असून नागरिकांना दररोज पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत शहरामध्ये 500 एमएलडी प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी 540 एमएलडी पाण्याची आवश्कता आहे. भामा-आसखेड धरणाचे पाणी आणण्यासाठी कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम सुरू आहे. 100 एमएलडी पाणीपुरवठा त्याठिकाणाहून होणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापासून आम्ही शहराला दररोज पाणीपुरवठा करू शकतो, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिले.
स्थायी समितीमध्ये अंदाजपत्रक सादर केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होत. पिंपरी चिंचवड महापालिकेने आंद्रा धरणांतून 100 एमएलडी प्रति दिन व आसखेड दरणातून 167 एमएलडी प्रति दिन पाणी कोटा आरक्षित केला आहे. त्यानुसार या धरणांतून पाणी आणणे शहरासाठी आवश्यक आहे. याठिकाणाहून आणलेले पाणी शुद्ध करण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम सुरू आहे. या कामाची मुदत 24 महिने इतकी आहे. यासाठी 79 कोटी खर्च केला जाणार आहे. निघोजे तळवडे व देहू ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. निघोजे-तळवडे येथे 100 एमएलडी व भामा आसखेडमधून 200 एमआलडी पाणी उचलण्याकरिता जॅकवेल व पंपिग स्टेशन उभारण्यासाठी जागा ताब्यात घेण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहाराला पाणीपुरवठा करण्यासाठी 2021-22 या अर्थिक वर्षामध्ये 183 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाण्याच्या टाक्या उभारणीसाठी 32 कोटी
चिखली जलशुद्धीकरण केंद्र महापालिका हद्दीत समाविष्ठ झालेल्या क्षेत्रातील राहिलेल्या भागात पाणीपुरवठा योजना जलद गतीने साकारण्यात येणार आहे. त्यासाठी पाण्याची मुख्य नलिका टाकणे, उंच पाण्याचा टाक्या बांधणे, पंप हाऊस उभारणे व कार्यान्वित करणे यासाठी आगामी वर्षात 32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तातडीची सोय म्हणून जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार
सद्यस्थितीत शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहरामध्ये दररोज पाणीपुरवठा केला जावा अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी तसेच सर्वांना मुबलक पाणी मिळवून देण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणाऱ आहे. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर नंबर 23 येथील जलशुद्धीकक्षरण केंद्राची क्षमता सुमारे 100 एमएलडीने वाढविण्यात येणार आहे. त्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी या वर्षामध्ये 23 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.