रत्नागिरी – गुहागर तालुक्यातील अंजनवेल-दाभोळ येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचा रेल्वे जवळचा वीज खरेदी करार संपुष्टात आल्याने वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी कंपनीच्या वतीने केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत.
आरजीपीपीएल कंपनीला वीज निर्मितीसाठी नेहमीच तारेवरील कसरत करावी लागत होती. केंद्र सरकारने अनुदान दिल्याने रेल्वेसाठी 500 मेगावॅट वीजनिर्मितीचा करार करून कंपनी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 1 एप्रिल 2017 पासून ते मार्च 2022पर्यंत पाच वर्षांकरता हा करार करण्यात आला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली.
परिणामी रेल्वे कडील विजेची मागणी कमी करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात तर दिवसाला मागणीनुसार फक्त 250 ते 300 मेगावॅट वीज निर्मिती केली जात होती. हा करार संपुष्टात आल्यानंतर कमी दरामध्ये वीजनिर्मिती होत नसल्याने कोणताही नवीन वीज खरेदीचा करार झालेला नाही.
दरम्यान, वीज खरेदीचा नवीन करार नसल्याने आरजीपीपीएलच्या यूपीएल कंपनीने दोन महिन्यांपूर्वी कंपनीतील 75 कामगारांना कमी केले होते. ही कंपनी कायमची बंद पडल्यास सुमारे साडेचार हजार कामगारांवर बेकारीची आपत्ती येणार आहे. यामुळे राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे, असा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिला होता.
कोकण एलएनजीवरही होणार परिणाम
बेरोजगारीसोबत कंपनी बंद पडल्याचा फटका कोकण एलएनजीलाही बसणार आहे. मुळात दाभोळ वीज प्रकल्प उभा राहतानाच वीज निर्मिती, परदेशातून गॅस आयात करणे, रिगॅसीफिकेशन आणि पाईपद्वारे गॅस वाहतूक असे चार प्रकल्प एकाच कंपनीत अंतर्भूत होते. यामुळे या चार स्वतंत्र युनिटची बांधणी, आरेखन, तांत्रिक बाबी एकमेकाला संलग्न आहेत.