नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात पश्चिमी मध्य बाजूला असलेले जवाद चक्रीवादळ येत्या रविवारी ओडिशात पुरीच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. तथापि, त्याचा वेग मात्र मंदावण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
सध्या हे वादळ विशाखापट्टणमपासून 230 किमी अंतरावर असून पुरीपासून ते 430 किमी अंतरावर आहे. पुढील बारा तासात ते मंदावण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार असून तो पर्यंत त्याचा वेग आणखी कमी झालेला असेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाला सौदी अरेबियाने जवाद हे नाव सुचवले आहे.
गेल्या 30 नोव्हेंबर रोजी अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. तो 2 डिसेंबरपर्यंत आणखी तीव्र झाला आणि शुक्रवारी दुपारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. आंध्र किनारपट्टीवर तसेच ओडिशाच्या तटवर्ती भागात यामुळे मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्या भागातील सर्व मच्छीमारांना आणि स्थानिक रहिवाशांना तांबड्या रंगाचा धोक्याचा इशारा देणारी निशाणे फडकवण्यात आली आहेत. आसाम, मेघालय, त्रिुपरा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी अतिजोराच्या पावसाचाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.