नवी दिल्ली :- भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी लोकेश राहुलचे कौतुक केले आहे. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत राहुलने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या प्रकारे फलंदाजी केली ती पाहून तो आता खरोखर भरात आला असल्याचे सिद्ध झाले. त्याला तब्बल चार महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दुर राहावे लागले होते. मात्र, दुखापतीतून सावरत त्याने विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेत संघाची गरज ओळखून ज्या जबाबदारीने व जिद्दीने फलंदाजी करत विराट कोहलीसह संघाचा विजय निश्चित केला त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडच आहे, असेही कुंबळे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, के.एल.ने चांगली कामगिरी केली आहे. यामुळे संघाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्या परिस्थितीत त्याने घेतलेला अनुभव आणि शेवटपर्यंत तिथे टिकून राहणे हे भारतासाठी खरोखरच चांगले लक्षण आहे. आता स्पर्धेतील पुढील लढतींमध्येही त्याच्याकडून संघाला अशाच खेळीची सातत्याने गरज आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रविवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतानं पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी संयमी खेळ करत केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला . चौथ्या विकेटसाठी दोघांनी 165 धावांची भागीदारी केली. भारताकडून राहुलने सर्वाधिक 115 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या होत्या तर विराट कोहलीने 116 चेंडूत 85 धावांची खेळी केली.