धर्मशाला :– यजमान भारतीय संघ आज (बुधवार) एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानशी दोन हात करणार आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवल्यावर आत्मविश्वास उंचावला असला तरीही या सामन्यात विजय मिळवण्याचे खरे दडपणही भारतीय संघावरच राहणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान..
वेळ – दुपारी 2 पासून
ठीकाण – नवी दिल्ली
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
कर्णधार रोहित शर्मा अंतिम संघ निवडताना आता कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी 3 बाद 2 अशी बिकट स्थिती केल्यावर विराट कोहली व लोकेश राहुल यांनी जिद्दीने खेळ करत विजय मिळवून देणारी कामगिरी केली.
मात्र, तरीही भारतीय फलंदाज स्विंग गोलंदाजीसमोर ढेपाळतात हे पुन्हा एकदा या सामन्याद्वारे सिद्ध झाले होते. तसेच अफगाणीस्तानचा लेग स्पीन गोलंदाज रशीद खान अनेक मोसमांपासून आयपीएल खेळत असल्याने त्याला भारतीय वातावरणाची सवय असल्याने त्याची गोलंदाजी खेळण्याचे आव्हान भारतीय संघातील नवोदित फलंदाजच नव्हे तर वरिष्ठ खेळाडूंनाही कठीण जाऊ शकते.
आता या सामन्यासाठी श्रेयस अय्यरला संघात कायम राखले जाणार की सूर्यकुमार यादवला संधी दिली जाणार हे देखील निर्णायक ठरणार आहे. तसेच महंमद सिराजला विश्रांती देत महंमद शमीला खेळवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. खरेतर पहिल्या लढतीतील विजेता संघ बदलण्याची वृत्ती अनेक कर्णधारांची नसते त्यामुळे रोहित हाच संघ कायम राखेल असेही बोलले जात आहे.
मात्र, असे जर घडले तर इशान किशऩ, सिराज, श्रेयस अय्यर व खुद्द कर्णधार रोहितलाही अत्यंत जबाबदारीने खेळावे लागेल. संघाचे कर्णधारपद मिळाल्यापासून रोहितकडून मोठी खेळी झालेली नाही. त्यातच तो सातत्याने इनस्विंग चेंडूवर बाद होत आहे. त्यामुळे भारतीय संघाची खरी मदार कोहली, राहुलसह संधी मिळाल्यास सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्यासह रवींद्र जडेजावरच राहणार आहे.
लक्षवेधी…
– शुभमन गिलची उणीव भासणार
– श्रेयसच्या जागी शार्दुलच्या समावेशाची शक्यता
– महंमद शमीला संधी मिळण्याची शक्यता
– अंतिम संघ निवडीत सूर्यकुमारच्या नावाची चर्चा
– पहिल्या सामन्याप्रमाणे तीन फिरकी गोलंदाज कायम राखेल
– पंड्याकडून आतापेक्षा जास्त सरस कामगिरीची अपेक्षा
दुसरीकडे या स्पर्धेत अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला असला तरीही त्यांचा संघ कोणत्याही संघाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. त्यांच्याकडे रेहमनुल्लाह गुरबाज, इब्राहीम झद्रान, रेहमत शाह, कर्णधार हसमतुल्लाह शाहीदी असे चांगले फलंदाज आहेत. गोलंदाजीतही फजलहक फारुखी, नवीन उल हक हे भरात असलेले गोलंदाज आहेत. त्यांची सर्वात जास्त मदार मात्र लेग स्पीन गोलंदाज रशीद खानवरच राहणार आहे.
रोहित कधी खेळणार..?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. सलामीला त्याच्यासह या लढतीत इशान किशऩ डावाची सुरुवात करण्याची शक्यता असून त्यांनी जर चांगली सलामी दिली तरच नंतरच्या फलंदाजांवरील दडपण दूर होणार आहे. रोहितला गेल्या अनेक सामन्यांत अशी भक्कम सुरुवात करुन देणे जमलेले नाही. या सामन्यात त्याच्याकडून कर्णधारम्हणून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.