– विलास भि. कोळी
जुन्या वाड्यांच्या भिंतींवर आज इतक्या वर्षांनंतरही गवतदेखील उगवत नाही. अशा अप्रतिम निर्माण कर्त्याला मानाचा मुजरा.
ज्यावेळी आपण प्रवास करतो त्यावेळी आपणाला प्रत्येक गावात एक तरी वाडा दिसतोच. त्या वाड्याचे निरीक्षण केले तर असे लक्षात येते की, बांधकाम साहित्य म्हणून मातीच्या भेंड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. महाराष्ट्रातील विविध वास्तू या त्यांच्या स्थापत्यापेक्षा कधी कधी जे तंत्रज्ञान वापरून बनवले आहे त्यामुळे प्रसिद्ध असतात.
असे प्रयोग त्या काळात काही विशिष्ट हेतू बाळगून त्याची निर्मिती केलेली असते. काळाच्या ओघात हे सगळे नष्ट होते की काय अशी आता भीती वाटायला लागली आहे. अशाच आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाची नव्याने माहिती व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.
वाडा बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या विटांना भेंडे म्हणतात. वाडा बांधण्यासाठी पूर्वी काही ठिकाणी मातीचे भेंडे तर काही ठिकाणी भाजलेल्या चपट्या सपाट विटा वापरत असत. पूर्वी आपल्या पूर्वजांनी मातीचे परीक्षण करून विशिष्ट अंदाज बांधण्यासाठी स्वतःची अशी शैली विकसित केलेली होती. अनेक ठिकाणच्या मातीचे नमुने गोळा करून त्याच्या चाचण्या घेत.
जमिनीचे दोन प्रकार म्हणजे काळी जमीन आणि पांढरी जमीन. काळी जमीन म्हणजे शेती करण्यासाठी योग्य आणि पांढऱ्या मातीची जमीन ही राहण्यासाठी किंवा लोकवस्तीसाठी असे. या मातीमध्ये जनावरांचे शेण, कुजलेले वाळलेले गवत, झाडांचा पालापाचोळा, केरकचरा, राख एकजीव होऊन माणसांच्या, जनावरांच्या पशु-पक्ष्यांच्या, बैलगाडीच्या चाकामुळे वस्तीतील माती मळली जाऊन पांढरी माती तयार होत असे.
झाडांसाठी, पिकांसाठी आवश्यक असलेले द्रव्य या मातीत नसल्याने ती नापीक बनते. अशीच माती पूर्वी बांधकामात वापरली जायची. कित्येक वेळेला माळावरची माती, मुरूम पावसाने वाहून या पांढऱ्या मातीत येऊन मिसळते. पूर्वी पाणथळ जमिनीत उभे व आडवे चर खोदून घेतात, पावसाळ्यात पावसाचे पाण्याबरोबर माती वाहून त्या चरात बसते, पावसाळ्यानंतर चरात बसलेली माती काढून घेऊन त्या मातीमध्ये योग्य ते पदार्थ मिसळून ती माती बांधकामात वापरत असत.
ज्या ठिकाणची माती उत्तम प्रकारची आहे, असे लक्षात आल्यावर ती माती भेंडे किंवा विटा तयार करण्यासाठी वापरत असत. प्रथम ती माती चाळून घेत. चाळलेली माती 21 दिवस भिजत ठेवली जाई. त्यामध्ये बारीक रेती, गूळ, बेल, भेंडी, गाईचे शेण, डिंक, घोड्याची लीद, कात, ताग, उडदाचे पीठ, जवसाचे पाणी, गुगुळ, हिरडा, बेहरडा, आवळा, बाबळीच्या बिया, भोकराचा रस असे चिकटपणा निर्माण करणारे पदार्थ मिसळले जात.
याचा हेतू मातीची जलरोधकता, चिकटपणा व ताकद वाढवणे आणि पिकांसाठी, वनस्पतीसाठी आवश्यक असलेले द्रव्य त्यातून नष्ट करणे हा असतो. त्यामुळे आजही मातीचे भेंडे असलेल्या भिंतीवर गवत, वनस्पती तग धरत नाहीत. माती एकजीव व मऊ होण्यासाठी ती रोज रेडा, हत्ती, बैल किंवा माणसं यांच्याकडून तुडवली जाई. माती एकजीव झाल्यावर त्याच्या विशिष्ट आकाराच्या विटा तयार करीत. अशा विटांना भेंडे असे म्हणतं.
खास कमावलेल्या पांढऱ्या मातीच्या भेंड्याच्या भिंती पुष्कळ ठिकाणी आढळतात. काही ठिकाणी भुईकोटांना व गावकुसांना, वाड्यांनाही अशाच प्रकारची माती वापरलेली असते. ही माती साधारण पावसाने धुऊन जात नाही इतकी मजबूत व चिकण असते. जुन्या भुईकोटाचे तटही या मातीचे मोठ्या जाडीचे केलेले असत.
दगडाची किंवा विटांनी बांधलेली तटबंदी तोफेच्या गोळ्यांच्या तडाख्याने तटबंदीला खिंडार पाडत असत. अशावेळी मातीचे जाड कोट टिकाव धरीत असत. तोफेचा गोळा आला तरी, भिंत जाड असल्यामुळे तोफेचा गोळा न फुटता तो तिच्या पोटातच गढून जात असे.
भेंड्याचे आकार वेगवेगळे असून खालच्या बाजूला मोठाले तर वरच्या बाजूला छोटे भेंडे असत. तयार झालेले भेंडे प्रखर उन्हामध्ये वाळविले जात. पावसाचा त्यावर प्रत्यक्ष परिणाम पाहण्यासाठी त्या पावसात भिजत ठेवत किंवा पाण्याच्या धारेखाली धरून त्याची परीक्षा घेतली जाई. वाळलेल्या भेंड्यावर टिकावाचे अथवा पहारीचे घाव घातले असता, मार लागला तेवढा छोटासा टवका उखडला जातो. एक भेंडा एका व्यक्तीला उचलणार नाही याची खात्री केली जाई. अशा पद्धतीने भेंडे तयार करत व चाचण्याही करत असत.
पूर्वी बांधकामात सिमेंट वापरले जात नव्हतं. त्याला पर्याय होता पांढरी माती. ही माती चिवट असायची. ऊन, वारा, पाऊस, धरणीकंप यांचा तडाखा सोसून गेली तीनचारशे वर्षे झाली तरी पांढऱ्या मातीच्या भिंती, बुरुज, वाडे, गढ्या आजही सुस्थितीत आहेत. आताच्या सिमेंटलाही मागे टाकेल अशी ही पांढरी चिवट माती यावर संशोधन व्हायला पाहिजे.
वाड्याचे बांधकाम करताना परिसरातील सहज उपलब्ध होणारे दगड, माती, विटा, चुना, लाकूड, मनुष्यबळ, कारागीर यांचा वापर करण्यावर भर असे. अशा सोयी बरोबर संरक्षण हा घटक देखील महत्त्वाचा मानला गेला आहे.
माती कोणतीही असो त्यामध्ये बिया रुजतात, गवत उगवते, झाडे उगवतात परंतु वाड्याच्या बांधकामासाठी वा बुरुजासाठी मातीचे जे मिश्रण तयार केले जाते त्यामध्ये साधे गवतसुद्धा उगवत नाही. गड, किल्ले, वाडे, गढ्या बांधणीसाठी दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे आपण बघतो. याच दगडामध्ये वाढलेल्या झाडांमुळे तटबंदी, भिंती, बुरुज ढासळलेले आपण बघतो.
परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात माती वापरून देखील त्यामध्ये गवत, अथवा इतर झाडे वाढली नाहीत हे आश्चर्यजनक आहे. जर का झाडे वाढली असती तर असे अजस्र भिंती, बुरुज केव्हाच ढासळले असते. आता असा प्रश्न पडतो की, तीनचारशे वर्षांपूर्वी असं कोणते तंत्रज्ञान या मातीच्या निर्माणासाठी वापरलं होतं की, त्यामुळे ही माती दगडापेक्षाही दणकट बनवली गेली.