अलीकडे आपण मदर्स डे, फादर्स डे साजरे करीत असतो. पण आपल्याला माहीत आहे का, आपल्या भारतीय पंचांगात श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी “मातृदिन’ असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे पिठोरी अमावस्येला, “मातृदेवो भव’ असे सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीनुसार मातृदिन आहे.
आई म्हणजे करुणेचा सागर, त्यागमूर्ती अशीच प्रतिमा अनेकदा आपल्या मनावर ठसवलेली असते. पण आई म्हणजेसुद्धा माणूसच असते. तिलाही माणसाला असतात, तशा सगळ्या इच्छाआकांक्षा, स्वप्ने असणे स्वाभाविक असते. पण चित्रपट, जाहिराती यांमध्ये स्त्रीची प्रतिमा अगदी ठरीव आणि एकरंगी दाखवली जाते. तिच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया, तिची मतं यांना त्यात फारसे स्थान नसते.
मराठी साहित्यात आई कशी रंगवली जाते? पूर्वीपासून ते आतापर्यंतचं वाङ्मय पाहिलं तर तिची रूपं बदलत जाताना आपल्याला दिसतात. साने गुरुजी, कवी यशवंत यांनी अथांग करुणेचा सागर असलेल्या मातेचे चित्रण केले. व्यंकटेश माडगूळकरांच्या “करुणाष्टक’ मधली त्यांची आई पोरांच्या तोंडात दोन घास घालता यावेत यासाठी अनेक खटपटी करते. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांनी आईचे व्यक्तिमत्त्व बाळबोध, प्रेमाने ओथंबलेले असे दाखवले.
मात्र मालती बेडेकर, शकुंतला परांजपे अशा काही लेखिकांनी मातृत्वाचे देव्हारे माजवण्याचे टाळले. असे लक्षात येते की, बहुतेक पुरुष लेखकांच्या साहित्यातील आई एक तर करुणास्पद (दयनीय) तरी असते किंवा मग पूजनीय, आदरणीय तरी असते. सगळ्याच स्त्रियांना आई होण्याची आत्यंतिक ओढ असते हे या लेखकांनी गृहीत धरलेले दिसते. मात्र स्त्रीच्या मनातली बाळंतपणाची भीती, नवीन जबाबदारीविषयीची साशंकता, तिच्या प्रगतीत मातृत्वामुळे पडणारा खंड यांचे चित्रण फार कमी लेखकांनी केले.
त्यानंतरच्या काही लेखकांनी मात्र स्त्री मनाची आंदोलने बारकाईनं रेखाटलेली दिसतात. गंगाधर गाडगीळांच्या “थांब, उद्याचे माऊली’ या कथेमध्ये एका पहिलटकरणीच्या मनातील उलथापालथी, मातृत्वाच्या कल्पनेनं अतिसंवेदनशील झालेलं हळवं मन उत्कटपणे चितारलं आहे. जन्माला येणाऱ्या नव्या जिवाच्या कल्पनेनं ती कावरीबावरी होते. गाडगीळांच्या “अभद्र’ या कथेतली आई संसार, मुलगी सोडून दुसऱ्या पुरुषाबरोबर संसार मांडते. पण मुलीसाठी ती अखेरपर्यंत तळमळत राहते. निदान तिच्या लग्नप्रसंगी तरी आपल्याला हजर राहता यावं यासाठी तिची इतकी तडफड होते की, सगळा स्वाभिमान गुंडाळून ती त्यासाठी प्रयत्न करीत राहते.
ह. मो. मराठे यांच्या अनेक कथांमधून आईचे वास्तव दर्शन घडते. आईचं दुःख, तिचे सल, तिची कुचंबणा, खोलपर्यंत रुजलेलं मुलांविषयीचं तिचं प्रेम याचं उत्तम दर्शन त्यांच्या कथांमधून दिसतं. घरात आईला करावी लागणारी कामं तर कुणाच्या खिजगणतीतही नसतात. पण त्यातून तिची होणारी धावपळ, काबाडकष्ट आणि या थॅंकलेस जॉबमधून आईच्या मनात येणारं वैफल्य ह. मो. मोठ्या सहृदयतेनं दाखवतात. नोकरी करणाऱ्या, स्वत्व शोधणाऱ्या नायिका त्यांच्या कथांमधून दिसतात.
कालांतरानं स्वतः स्त्रियाच जेव्हा त्यांच्या मनातली खळबळ, त्यांची मतं शब्दातून मांडू लागल्या, तेव्हा “स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळची माता’ असते वगैरे सुभाषितं केवळ इतरांच्या सोयीसाठी तयार केलेली आहेत हे लक्षात येऊ लागलं. विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, नीरजा ह्या प्रतिभावंत लेखिका आपल्या लेखनातून स्त्रीची अनेक रूपं दाखवू लागल्या. आई म्हणजे डोळ्यातून टिपं गाळणारी, सतत काळजी करणारी, इतरांसाठी धावूनधावून सारं करणारी ही तिची प्रतिमा त्यांनी पुसून टाकली. आई नावाचं माणूस बुद्धिमान, रसिक, कर्तृत्ववान असू शकतं हे त्यांनी आपल्या लेखनातून दाखवून दिलं.
कुणीही तिचा उपयोग करून घ्यावा, कुटुंबानं तिला गृहीत धरावं अशी केवळ एक भाबडी बाई म्हणजे आई नव्हे, हे त्यांनी आपल्या कथाकादंबऱ्यांतून, कवितांमधून व्यक्त केलं.
जन्म देणं हे निसर्गानं खूप महत्त्वाचं काम आईवर सोपवलेलं आहे पण म्हणून दुसऱ्यांसाठी जन्मभर राबत राहणं ही तिची एकटीची जबाबदारी नसते, हे आताच्या सुशिक्षित पिढीनं तरी समजावून घ्यायला हवं.
साहित्यात असो की सिनेमात किंवा टीव्ही सीरिअलमध्ये, आईचे व्यक्तिमत्त्व जास्त करून कोणताही निर्णय न घेणारं, स्वतंत्र विचार नसणारं आणि सोशिकच दाखवलं जातं. पण आई बुद्धिमानही असते. विचारी, खंबीर, प्रगल्भ, महत्त्वाकांक्षी… असे मनुष्यस्वभावाचे सर्व पैलू आईमध्ये असतात. फक्त त्यासाठी डोळ्यावरची झापडं काढून आपण तिच्याकडे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहायला हवं.
आपण समाजात पाहतो, अनेक स्त्रिया ऑफिसमध्ये मोठ्या पदावर काम करतात. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. कुणी पत्रकार असतात. संपादक, चित्रपट निर्माती, वैमानिक, खेळाडू… या सर्व स्त्रिया माणूसच असतात. त्याही आया असतात. शेतातली कष्टाची कामं तर बायका अगदी चिकाटीनं उपसतात. कितीतरी स्त्रिया सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लोकांच्या उपयोगी पडावं ही बाईची नैसर्गिक वृत्ती तिला कार्यकर्ती बनवते.
वत्सलता हा तिचा सहजस्वभाव आहे. बऱ्याचदा संसार, कुटुंब यांच्या सोयींना प्राधान्य देऊन आपल्या इच्छाआकांक्षांना आया मुरड घालतात. पण अशा कर्तृत्ववान आयांना त्यांच्या मुलांनी तिच्या कामासाठी सक्रिय पाठिंबा दिला, घरातील काही जबाबदाऱ्या स्वतः उचलल्या, तिनं घरात राहून आपलेच लाडकोड पुरवावेत अशा अपेक्षा जरा कमी केल्या तर आईबद्दल खरा आदरभाव व्यक्त केल्यासारखे होईल, नाही का?
तेव्हा आपण आपापल्या आयांना आधी माणूस म्हणून समजून घेऊ या. कधीतरी तिच्या पाया पडण्यापेक्षा किंवा व्हॉट्सऍपमधून आईचे गोडवे गाण्यापेक्षा तिच्या आवडीनिवडी, सोयी-गैरसोयी समजावून घेऊ या. आपल्या पुढच्या पिढीच्याही हे लक्षात आणून देऊ या की आई ही फक्त आई नसते; ती माणूसही असते!
-माधुरी तळवलकर