कोलंबो – श्रीलंकेत शनिवारी संध्याकाळी लागू करण्यात आलेला 36 तासांचा कर्फ्यू सोमवारी सकाळी 6 वाजता उठवण्यात आला आहे परंतु देशात अजूनही आणीबाणी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
श्रीलंकेला स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या निदर्शनांतर शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. याच दरम्यान श्रीलंकेचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे यांनी आपल्या सर्व खात्यांचा राजीनामा दिला आहे.
श्रीलंकेला सध्या परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे अन्न, इंधन, वीज आणि गॅसची टंचाई निर्माण झाली आहे आणि आर्थिक मदतीसाठी मित्र देशांची मदत मागण्याची वेळ त्या देशावर आली आहे. त्यामुळे नागरीकांमधील अस्वस्थता कमी झालेली नाही. कर्फ्यू हटवूनही, देशात अजूनही आणीबाणीच्या स्थितीचा प्रभाव आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिल रोजी राजपत्र अधिसूचना जारी करून देशात आणीबाणी लागू केली आहे. ती मागे घेण्याबाबत सरकारने अजून कोणतेही संकेत दिलेले नाहीत.