मंगळूरू – कर्नाटकातील उडूपी जिल्ह्यात प्रशासनाने जिल्ह्यातील हायस्कूलच्या परिसरामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. उद्यापासून ते 19 फेब्रुवारीपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
हिजाबच्या मुद्यामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे राज्य सरकारने तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता उद्यापासून शाळा पुन्हा सुरू होत असल्यामुळे उडूपी जिल्हा प्रशासनाने हे खबरदारीचे पाऊल उचलले आहे.
या आदेशांनुसार जिल्ह्यातील हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या परिसरांमध्ये पाच किवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मज्जाव असणार आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा अथवा सभांनाही परवानगी असणार नाही. कोणत्याही घोषणा आणि गाणी वाजवण्यासही या काळात बंदी असणार आहे.
इयत्ता 10 पर्यंतच्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू होतील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. राज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हा पातळीवर शांतता कमिट्यांच्या बैठका घ्याव्यात अशी सूचना आपण जिल्हा अधिकारी, पोलीस अधिक्षक आणि शाळा प्रशासनाला आपण केली असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले.