पुणे, दि. 13 -महापालिका हद्दीमध्ये 34 गावांचा समावेश झाल्यानंतर पालिकेत सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस, शिवसेना महाविकास आघाडी यांच्यात निधीबाबत वाद सुरू झाला होता. आता, सत्तांतरानंतर निधी बाबत पुन्हा एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. यात 34 गावांतील मूलभूत कामेही रेंगाळली आहेत.
महापालिकेत समाविष्ट गावांत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधीची गरज असून राज्य शासनाने (महाविकास आघाडी) हा निधी महापालिकेला द्यावा, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून केली जात होती. तर, गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी भाजप सत्ताधारी असलेल्या महापालिकेचीच आहे. त्यामुळे महापालिकेने 34 गावांतील कामे पूर्ण करावीत, असे धोरण पालिकेतील विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली होती.
मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आता 34 गावांच्या विकासकामांबाबतच्या आपल्या धोरणात बदल केला आहे. या गावांच्या विकासासाठी राज्य सरकारने निधी देण्याबाबतचा आग्रह राष्ट्रवादीकडून केला जात आहे. यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीतील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या गावांच्या विकासाबाबतच्या निधीचा मुद्दा मांडणार आहेत. महापालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये मूलभूत सुविधाही मिळत नसल्याने संबंधीत गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. अद्यापही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, खासगी टॅंकरने होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत होत असतो, कचरा संकलनाची योग्य व्यवस्था नसल्याने कचऱ्याची ढिग ठिकठिकाणी दिसतात, पावसामुळे सध्या सर्वच गावांतील रस्ते उखडले आहेत या कामांबाबत महापालिका प्रशासकांचेही दुर्लक्ष आहे. निधी अभावी कामे करता येत नसल्याचे उघड आहे. त्यामुळे राज्य शासनाने या गावांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आता लावून धरली आहे.
भाजप श्रेय घेण्याच्या तयारीत…
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पालिकेत सत्ता असतानाही भाजपने या गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनाचा 350 कोटींचा आराखडा केला, त्याची कामे सुरू आहेत. या गावांमध्ये सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडून (भाजप-शिंदे गट) निधी उपलब्ध होणार आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगत आता भाजपचे पदाधिकारी याचे श्रेय घेण्याच्या तयारीत आहेत.