जांबूत परिसरात मुसळधार : कोबी पीक कुजले
जांबूत – मागील दोन दिवसांत शिरूर तालुक्याच्या पश्चिम बेट भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जांबूत, पिंपरखेड, वडनेर खुर्द, फाकटे, चांडोह परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे उपळ निघत असून शेतातून पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याआधीच्या काळात दोनवेळा जोरदार अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने अनेक तरकारी पिकांसह सोयाबीन, उसाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अशातच दोन दिवस पडणाऱ्या परतीच्या मुसळधार पावसाने काढणीस आलेले सोयाबीन, मका, कोबी, झेंडू , नव्याने तयार करण्यात येत असलेले कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या उसाचा गाळप हंगाम सुरु झाला. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे उसतोडणी मजुरांना उसाची तोड करता येत नाही. परिणामी कांद्याची रोपे पावसाने जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. जर पावसामुळे वेळेत उसाची तोड झाली नाही तर अनेक शेतकऱ्यांना कांद्याचे पिक घेणे अशक्य होणार आहे. संपूर्ण पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात कोणतेही पिके घेता आली नाहीत.
जी पिके घेतली ती देखील पावसामुळे खराब झाली. ओढवलेल्या परिस्थितीमुळे बेट भागात ओला दुष्काळसदृश परिस्थिती झालेली आहे. शेतकरी चिंतातूर झाला आहे. अशातच ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले. खरे परंतु त्याबाबत प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे पंचनामे केवळ कागदावरच राहिले आहेत.