नवी दिल्ली – नागरिकांच्या फायद्यासाठी कठोर आणि मोठे निर्णय घेतले जायला पाहिजेत. नागरिकांना हे लाभ कित्येक दशकांपूर्वीच मिळायला पाहिजे होते. मात्र असे निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर केलेली टीका म्हणजे बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि राजकीय फसवणूक आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एका मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करणारे कायदे, जीएसटी, आधार आणि नव्याने बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या इमारतीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पूर्वी जी आश्वासने दिली गेली होती, त्यापासून विरोधकांनी “यु टर्न’ घेतल्याची टीकाही पंतप्रधानांनी केली.
कृषी कायद्यावरून जे लोक टीका करत आहेत त्यांच्याकडे बघितले तर बौद्धिक अप्रामाणिकपणा आणि राजकीय धोकेबाजीचे उदाहरण समोर येते असे पंतप्रधान म्हणाले. जर एखादे आश्वासन दिले गेले असेल, पण त्याची पूर्तता केली जाऊ शकली नसेल तर ते समजले जाऊ शकते. मात्र हेच आश्वासन दिलेल्या राजकीय पक्षांनी आता “यु टर्न’ केलेला आहे. त्यांनीच स्वतः केलेल्या आश्वासनांबाबत हेच पक्ष आता बदनामी पसरवत आहेत. हे लोक शेतकऱ्यांचा लाभ होण्याचा विचार करत नाहीत. ते केवळ त्यांच्या राजकीय लाभाचाच विचार करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
कृषी सुधारणा कायद्यांचे आश्वासन कॉंग्रेसने दिले होते. मात्र आता कृषी कायद्यांच्या विरोधी आंदोलनाला कॉंग्रेस केवळ स्वार्थासाठीच पाठिंबा देत आहे, असे भाजपने म्हटलेले आहे.
पूर्वी नवीन संसदेची गरज असल्याचे म्हटले जायचे. मात्र काम सुरू केल्यावर त्याला विरोध केला जातो आहे. हे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही पंतप्रधानांनी उपस्थित केला. याचप्रमाणे कृषी कायद्याबाबत आपण चर्चेला तयार असल्याचे सरकारने पूर्वीपासून म्हटले होते.
यासंदर्भात अनेक बैठका झाल्या मात्र आतापर्यंत कोणीही ठोस सुधारणा सुचवल्या नाहीत, याचीही आठवण त्यांनी करून दिली. पूर्वी केवळ पुन्हा सत्तेत येण्यासाठी काम केले जायचे. मात्र आपले सरकार देश उभारणीसाठी काम करत आहे. करोनाच्या साथीमध्ये इतर अनेक विकसित देशांपेक्षाही भारताने अधिक चांगले काम केले आहे. ऐक्याने, निश्चयाने आणि एकाच उद्देशाने सर्व देशाने सामूहिकपणे काम केले तर किती चांगले काम केले जाऊ शकते हे देशाने दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.