(अमित डोंगरे) – आयपीएल स्पर्धेत नवनवे नियम यंदापासून अवलंबले जात आहेत. त्यात जवळपास प्रत्येक नव्या नियमाबाबत मतमतांततरे आहेत. त्यातच भारताच्या महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने एका नियमाच्या उपयुक्ततेवरच बोट ठेवले आहे.
इम्पॅक्ट खेळाडूमुळे अष्टपैलू खेळाडूंची उपयुक्तता काय? हा तिचा प्रश्न अगदीच काही अयोग्य नाही. कारण जर संघात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करू शकणारा स्पेशालिस्ट खेळाडू दाखल झाला तर मग संघात जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू घेण्यालाच काही अर्थ उरणार नाही.
हार्दिक पंड्यापासून ते शार्दुल ठाकूरपर्यंत अनेक असे खेळाडू आहेत की जे त्या त्या संघात केवळ ते एक अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत म्हणूनच आहेत. केवळ फलंदाजीच करू शकेल अशा स्थितीत तर पंड्यालाही भारतीय संघात स्थान दिले जात नव्हते. जर तो गोलंदाजीच करू शकणार नसेल तर मग अष्टपैलू म्हणून त्याला संघात घेण्यात काय अर्थ आहे हेच निवड समितीनेही म्हटले होते. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेमुळे नवा पायंडा पडत आहे.
मूळचे 11 खेळाडू घोषित करायचे व चार इम्पॅक्ट खेळाडूही जाहीर करायचे. नियमानुसार ज्या वेळी मूळ खेळाडूला बदलून इम्पॅक्ट खेळाडूला मैदानात उतरवले जाते त्याचवेळी संघातील अष्टपैलू या संकल्पनेलाच छेद बसतो.
इतकेच नव्हे तर इम्पॅक्ट खेळाडू दाखल झाल्यावर तो गोलंदाजी करो अथवा फलंदाजी करो संघाची क्षमता वाढते. फलंदाजी करत असलेल्या संघाची फलंदाजी तर अखेरच्य क्रमांकापर्यंत बळकट बनते.
मग क्रिकेटमध्ये ती ईर्ष्या, रंगत, जिद्द, स्पर्धा व एकेका धावेसाठीचा संघर्ष दिसेल कसा व टीकेलही कसा.
हे म्हणजे असे झाले की पाच पायंडा व त्याची व्याप्ती आणखी वाढवून संघात असे 11 खेळाडू निवडायचे की ते फलंदाजी व गोलंदाजी सगळेच करतील व वेळ पडली तर सगळे यष्टीरक्षणही करू शकतील. मग स्पेशालिस्ट या शब्दालाचाही काही किंमत उरणार नाही. प्रयोग म्हणून इम्पॅक्ट खेळाडू ही संकल्पना ठीक वाटते, पण त्याचा पायंडा पडू नये.