मुंबई : राज्यात सध्या कोकणातील बारसू प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सहा तारखेला बारसूला जाऊन लोकांना भेटून बोलणार. कसं मला अडवू शकता, तो पाकव्याप्त काश्मीर किंवा बांग्लादेश नाही. माझ्या रत्नागिरीतील तो भाग आहे. अशी घोषणा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावरून शिवसेना ( शिंदे गट ) नेते, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी, “सर्वांना विश्वासात घेऊनच महाराष्ट्राचा गाडा पुढं घेऊन जायचा आहे. विरोधी पक्ष म्हणजे आपला दुश्मन आहे, ही उद्धव ठाकरेंची पॉलिसी आहे. कारण, ते सुडाचं राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरेंनीच बारसूचं नाव सुचवलं आणि तेच ६ तारखेला तिकडं जात आहेत. काय चौपाटी आहे का ती?.” असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना,“उद्धव ठाकरे दुतोंडी गांडूळ आहेत. बारसूला प्रकल्प करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र लिहिलं. ही वेळ उद्धव ठाकरेंनीच आणली. याच्यापाठीमागे ठाकरेंचं कटकारस्थान आहे. बारसूतील वातावरण चिघळवायचं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी लायक नाहीत, हे दाखवण्यासाठी सूडाचं काम उद्धव ठाकरे दुतोंडी सापासारखं करत आहेत,” अशी टीका रामदास कदम यांनी केली.
“उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. तेच बारसूत लोकांना भडकवण्यासाठी येत आहेत. पण, लोक उद्धव ठाकरेंच्या तोंडावर थुंकतील,” असे टीकास्र रामदास कदम यांनी सोडले आहे. “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून गुळाचा गणपती बसवला. स्वत: सहकार चालवत ५७ टक्के निधी राष्ट्रवादीने घेतला. अजित पवारांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेशी बेईमानी केली. त्यामुळेच ४० आमदारांना बाहेर पडावं लागलं. माझ्या मुलाला निधी न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना १० कोटी रुपयांचा निधी दिला,” असेही रामदास कदमांनी म्हटले.