– अमित डोंगरे
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त चर्चा रंगत आहे ती मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या सुमार कामगिरीची. अनेक दिग्गज खेळाडू आपापल्या परीने त्याला सल्लाही देत आहेत. मात्र, रोहितच्या फलंदाजीत काही तांत्रिक चुका आहेत असे वाटत नाही. त्याची मानसिकता मात्र खालावल्याचे त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसते. त्यासाठी त्याला प्रशिक्षकाची नव्हे तर मानसोपचार तज्ज्ञाची खरी गरज आहे.
यंदाच्या स्पर्धेतील मुंबईचे सामने पाहिले तर असे लक्षात येते की रोहित सुरुवात चांगली करत आहे, मात्र धावांच्या विशीत किंवा तिशीत काहीतरी गडबड होत आहे. ज्या पूलच्या फटक्यावर त्याची एकेकाळी हुकूमत होती, तोच फटका खेळताना रोहित सातत्याने बाद होत आहे. तसेच इनकमिंग चेंडूंवरही तो ग्लान्सवर चौकार वसूल करायचा. त्याच चेंडूवर तो एकतर त्रिफळाबाद होत आहे किंवा पायचित होत आहे. हे काही प्रमाणात विराट कोहलीच्याच काही दिवसांपूर्वी बाद होण्याच्या प्रकारासारखेच आहे. त्यावेळीही कोहली एका दडपणाखालीच फलंदाजी करण्यासाठी येत असल्याचे वाटायचे. आज रोहितबाबत तेच दिसते.
मुंबई संघ व्यवस्थापनाकडूनही त्याच्यावर प्रचंड दडपण असेल. एक वेळ ड्रेसिंगरुममधूनच सेट होऊन आल्यासारखा तो पहिल्या चेंडूपासून राज्य निर्माण करायचा. आता खालसा राज्याच्या मांडलिक राजासारखा तो खेळपट्टीवर येतो व गुलामी पत्करून परत जातो. आयपीएल स्पर्धेत आत्ता जे गोलंदाज त्याला बाद करताना दिसले ते काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे निश्चितच नाहीत. पण वेळ खराब असली की मांजरही डोळे वटारते व वेळ चांगली असली की वाघही चार पावले मागे हटतो.
आज हेच क्लब दर्जाचे गोलंदाज वाघ बनले आहेत व रोहित मांजर. त्याच्याकडे सर्व फटके आहेत, तंत्रही उत्तम आहे, केवळ गरज आहे ती सकारात्मक मानसिकतेची व त्यासाठीच प्रशिक्षकापेक्षा त्याला गरज आहे ती मानसोपचार तज्ज्ञाची. हे घडून आले तर नो हिटमॅन पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडेल व हिटमॅन ठरेल.