नवी दिल्ली – एस अँड पी या जागतिक पतमानांकन संस्थेने सलग तेराव्या वर्षी भारताचे पतमानांकन गुंतवणुकीसाठी सर्वात खालच्या पातळीवर कायम ठेवले आहे. मात्र भारतासाठी आगामी काळ आशादायक असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
गेल्या 13 वर्षापासून या संस्थेने भारताचे पतमानांकन बीबीबी उणे या पातळीवर कायम ठेवले आहे. भारत आतापर्यंत जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थापैकी एक होता. मात्र या वर्षी भारताचा विकास दर पाच टक्क्यांनी कमी होणार आहे. 2021-22 मध्ये हा विकास दर उसळून 8.5 टक्के तर 2022-23 मध्ये तो 6.5 टक्क्यावर जाण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी भारताचा विकास दर 4.2 टक्के नोंदला गेला आहे. ही 11 वर्षातील नीचांकी पातळी आहे. लॉकडाऊननंतर जाहीर केलेल्या पॅकेजवेळी ज्या सुधारणा जारी केल्या आहेत त्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
अन्यथा विकास दरावर अधिक नकारात्मक परिणाम होऊ शकतो असा इशारा या संस्थेने दिला आहे. गेल्या आठवड्यात मुडीज् या पतमानांकन संस्थेने भारताचे पतमानांकन गुंतवणुकीसाठी सर्वात खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. मात्र भारताची आर्थिक परिस्थिती या पतमानांकन संस्था समजतात त्यापेक्षा कितीतरी चांगली असल्याचे भारताचे मत आहे.