नवी दिल्ली : जगभरातील 60 देशांत हजारो जणांना बाधा झालेला आणि तीन हजारपेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूंच्या साथीने भारताचे दरवाजेही ठोठावले आहेत. आज सापडलेल्या सहा बाधीतांमुळे भारतातील बाधीतांची संख्या 28 वर पोहोचली आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या या साथीला तोंड देण्यास आपण किती सज्ज आहोत असा सवाल केला जात आहे.
मंगळवारी कोरोनाबाधीतांची जगभरातील संख्या 89 हजारावर पोहोचली. त्यात सुमारे तीन हजार जणांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चीनमधील लागण झालेल्याची संख्या 80 हजार 151 तर मृतांची संख्या दोन हजार 943 आहे. भारत जगभर हाहाकार माजवणाऱ्या या साथीपासून अद्याप दूर होता. मात्र, सध्या सापडत असलेल्या कोरोना बाधीतांच्या संख्येवरून आपण काळजी घेण्याची वेळ आल्याची धोक्याची घंटा वाजली आहे.
यापुर्वी केरळमध्ये तीन, दिल्ली आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी एक तर जयपूरमध्ये दोघांना बाधा झाली होती. मात्र आता उत्तर प्रदेशातील सहा जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जयपूरच्या सवाई मान सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या इटालीयन प्रवाशाच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पतीलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या महिलेच्या बडक्याचे आणि रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवल्यानंतर तेथे त्यांना कोरोना झाला असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
हे इटालीयन दाम्पत्य 20 जणांच्या गटासह भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सोबत असणाऱ्या अन्य प्रवाशांना विलगता कक्षात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या गटाने आग्रा, मांडवा, जैसलमेर, बिकानेर आणि जोधपूर येथे भेटी दिल्या आहेत.
उत्तर प्रदेशांत सहा जणांना बाधा
उत्तर प्रदेशातील सहा जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाली आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग यांनी सांगितले. या सहा जणांच्या बडक्याचे आणि रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नोएडातील दोन शाळा बंद
सकाळी नोएडामधील दोन प्रख्यात इंग्लिश माध्यमाची शाळा कोरोना विषाणूच्या भितीने बंद ठेवण्यात आली. दिल्लीतील कोरोना बाधीत रुग्णांनी गेल्या आठवड्यात वाढदिवसाची पार्टी दिली होती. त्यात त्यांची मुले आणि त्यांचे वर्ग मित्र यांसह नोएडातील 25 जण उपस्थित होते, असे समजते.
दरम्यान, एक शाळा चार ते सहा मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अन्य एक शाळा नऊ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. निर्जंतुकीकरणासाठी या शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत.
विमान कंपन्यांची सतर्कता
एअर इंडियाच्या विमानातून व्हिएन्ना येथून एक कोरोनाग्रस्त रुग्ण दिल्लीला आणण्यात आला होता. त्या विमानातील सर्व प्रवाशांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आचार संहितेचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तर इंडिगो कंपनीच्या विमानातून दुबईहून बंगळुरात करोनाग्रस्त विमानातील चार कर्मचाऱ्यांना घरीच एकटे राहण्यास कंपनीने सांगितले आहे.
आग्रा येथे हाय ऍलर्ट
बंगळुरात कोरोनाग्रस्त आढळलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्याची शोधमोहीम कर्नाटक आणि तेलंगणा कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. आग्रा येथील सहा जण दिल्लीतील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संणपर्कात आलेल्या सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय जयपूरमध्ये असलेल्या कोरोनाग्रस्त इटालीयन दाम्पत्याने आग्रा येथे भेट दिली होती. त्यामुळे आग्रा आणि जयपूरवर लक्ष केंद्रीत केले आहे.
सरकारची युध्दपातळीवर तयारी.
विमानतळ, बंदरावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. चीन, दक्षिण कोरीया, जपान, इराण, हॉंगकॉंग, मकाऊ, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, थायलंड, सिंगापूर आणि तैवानला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट देणाऱ्या प्रत्येकाची कसून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोनो विषाणूंची चाचणी करण्यासाठी 12 प्रयोगशाळा किंवा केंद्र तयार केली आहेत. त्याच्या निष्कर्षाची पडताळणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेत करण्यात येईल.