“वसुधैव कुटुंबकम’ हे वैश्विक सूत्र जगाला प्रदान करणाऱ्या अनेक वैभवशाली परंपरांचा प्रारंभ आपल्यापासून करणाऱ्या, सर्व धर्मांच्या अस्मितांना समान दर्जा देण्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्नशील असणाऱ्या भारत या राष्ट्राच्या भूमीचे तुम्ही-आम्ही सुपुत्र आहोत, याचा खरोखरीच आपल्याला अभिमान वाटावयास हवा.
एकीकडे नाथ संप्रदायाकडून विचारांचा प्रवाह स्वीकारून तो वारकरी संप्रदायाकडे वळविण्याची उत्तुंग कामगिरी करीत वारकरी संप्रदायाची पायाभरणी करणारे महाराष्ट्रातले ज्ञानदेव तर दुसरीकडे “माझ्या शरीराची आणि मनाची चादर मळवू नकोस’ असे ईश्वराला आळविणारे हिंदी भाषिक कवी संत कबीर अशी बहुभाषिक संतांची मालिका केवळ एवढ्यावरच थांबत नाही तर,
संबंध भारताच्या विविध प्रांतांत आद्यसमाजसुधारक ज्यांना म्हणता येईल असे दिशादिग्दर्शन करणारे अनेक महत्त्वपूर्ण संत जन्माला आले. संतांच्या वाङ्मयावर समाजाचे भरणपोषण झालेला भारत कदाचित जगभरातला एकमेव देश असेल. भक्तीचा प्रवाह समाजाच्या नसानसात खेळवत, प्रतिगामी वैचारिक जळमटे धुऊन टाकण्याचे कार्य या साऱ्या संतांनी केले. तोच धागा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या समाजसुधारकांनी हाती घेतला आणि स्वातंत्र्याची महती पटविण्यास प्रारंभ केला.
सन 1818 मध्ये इंग्रजांचा झेंडा “युनियन जॅक’ भारतावर फडकण्यास प्रारंभ झाल्यापासून तो उतरण्यास थेट 1947 सालापर्यंत तमाम भारतीयांना वाट बघावी लागली. हा प्रदीर्घ कालावधी अत्यंत कसोटीचा, संघर्षाचा आणि संयमाचा होता. “लेखणी मोडा आणि बंदुकी धरा’ हे सूत्र “अहिंसा कशी अनिवार्य आहे’ हे सांगणाऱ्या भारताला स्वीकारणे अवघड होते; परंतु ते पूर्ण बाजूला पडणेही अशक्य होते.
त्यातून एकीकडे महात्मा गांधींचा सत्याग्रह आणि दुसरीकडे सुभाषचंद्र बोस यांचा लढाईचा आग्रह अशा दुहेरी शस्त्राचा वापर देशाचे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी केला गेला. कुठे खजिना लुटला गेला, कुठे बॉम्ब टाकण्यात आले, कुठे बंदुकीचा वापर झाला, कुठे निदर्शने झाली, कुठे मोर्चे-प्रभातफेऱ्या काढण्यात आल्या, कुठे अन्नत्याग करण्यात आला,
लेखणीच्या माध्यमातून तर सातत्याने उद्बोधन केले जात होतेच. ज्याला जे योग्य वाटले, त्या मार्गाने इंग्रजी सत्तेचा धिक्कार करण्यात आला. या साऱ्या प्रदीर्घ लढ्याचा परिपाक भारतीय स्वातंत्र्याचा मंगलकलश प्राप्ती होण्यात झाला.
मोहनदास करमचंद गांधी नावाचा भारतीय संस्कार- परंपरेचे आपादमस्तक पूजन करणारा, कृश शरीरयष्टीचा माणूस देशासाठी महात्मा बनला आणि जगाला वैचारिक जाण आणि भान देण्यासाठी जणू कटिबद्ध झाला. धार्मिक विद्वेष गांधींसाठी वेदनादायी होता. हा देश एकोप्याने राहिला तर प्रगतीच्या मार्गाने वेगाने वाटचाल करेल अशी त्यांची धारणा होती. देशाचे वर्तन जगासाठी आदर्शवत ठरावे, अशी त्यांना तळमळ होती.
आपल्या देशाने ज्या वैभवशाली परंपरांची निर्मिती केली, शेकडो वर्षांपासून त्या जतन केल्या, त्या परंपरांचाच आधार घेऊन आपणही चालावयास हवे असे त्यांना वाटत होते. गांधी जाऊन सात दशके उलटली तरीही त्यांचे विचार आजही ताजेतवाने वाटतात. किंबहुना जगाला या विचारांचे महत्त्व गांधींच्या पश्चातच खऱ्या अर्थाने उमगले. भारताने जगाला बुद्ध दिला.
राजपुत्र सिद्धार्थ दु:खाच्या मुळाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो आणि बोधी प्राप्त करतो ही गोष्टच मुळात अद्भूत आहे. गुरू गोविंदसिंग-गुरुनानक विश्ववंद्य ठरतात. हे सारे भारतीय आपली परंपरा “वैश्विक’ आयामापर्यंत नेतात, यामध्येच भारताचे व्यापकत्व अधोरेखित होते.
मोठ्या कष्टाने प्राप्त केलेले भारतीय स्वातंत्र्य असामान्य म्हणावे लागले. जगातील विविध क्रांतींचा अभ्यास केल्यास त्यामध्ये अधिकाधिक संघर्ष हा रक्तलांच्छित आहे.
भारत हा एकमेव देश म्हणावा लागेल की ज्याच्या मुक्तीसाठी कमीत कमी रक्त सांडले गेले. कारण अहिंसेवर आपला दृढ विश्वास होता. भूमीला माता वा राष्ट्राला आईचा दर्जा देणारा हा एकमेव देश. धर्म, संस्कार, दया-क्षमा-करुणा, सहिष्णुता, मानवता या साऱ्या तत्त्वांचा स्वीकार करणारा भारत देश विज्ञानवादी तेवढाच आहे.
खरे तर येथील ऋषी-मुनी येथील आद्यसंशोधक; परंतु नंतरच्या काळातही येथील विज्ञानचिकित्सा आणि मीमांसा सातत्याने बहरत गेली. शून्याचा शोध लावणारा आर्यभट्ट, “लीलावती’सारखा अद्वितीय ग्रंथ लिहिणारे भास्कराचार्य, धर्माची सर्वसमावेशकता तर्कशुद्धरीत्या पटवून देणारे आदि शंकराचार्य हा सारा भाग भारतीय परंपरेचा कळस म्हणावा लागेल.
“भाक्रा नानगल’सारखे जगात नावाजले गेलेले धरण भारतात उभारले गेले. जगातली तिसऱ्या क्रमांकावर असणारी भारतीय रेल्वेची यंत्रणा चकित करणारी आहे. गव्हाचे कोठार असणारा पंजाब, आर्थिक राजधानी मुंबई, आपल्या काळजात मिरविणारा महाराष्ट्र, शिक्षणात अग्रेसर असणारा केरळ, आधुनिकतेचा वसा घेतलेला गुजरात, भाषिक अस्मिता राखणारी दक्षिणेकडची राज्ये हे सारे भूभाग भारताची मान उंचावणारे आहेत.
विक्रम साराभाईंपासून अब्दुल कलामांपर्यंत आणि जयंत नारळीकरांपासून सी. एन. आर. रावांपर्यंत अत्यंत नामवंत संशोधक या भूमीत जन्माला आले आणि त्यांनी जगाला चकित केले. या साऱ्या शास्त्रज्ञांच्या फळीने लावलेले नवनवीन शोध अद्भूत म्हणवले गेले. भारताच्या “इस्रो’ या अंतराळ क्षेत्रासाठी काम करणाऱ्या संस्थेने अनेक उपग्रह अंतराळात सोडले. जगाची शांतता भंग करण्यासाठी नाही तर ती अबाधित ठेवण्यासाठी आणि आम्हीही काही कमी नाही हे
दाखवून देण्यासाठी भारताने अण्वस्त्र निर्मितीत उडी घेतली आणि भारत अण्वस्त्रसज्ज झाला. एकीकडे भारतीय कमालीचे आस्तिक आहेत. ते देवदेवतांची पूजा करतात, मंदिरात जातात, वर्षभर व्रतवैकल्ये करतात. झाडे-गुरे, नद्या-सागर या साऱ्यांना त्यांनी देवत्व दिले आहे, पण दुसरीकडे ते कमालीचे विज्ञानप्रेमी आहेत. भारताच्या विज्ञानविषयक सुधारणांमध्ये त्यांना कमालीचा रस आहे. नवीन शोधांचे ते उत्स्फूर्त स्वागत करतात. जागतिक स्तरावर होत चाललेले बदल त्यांना ठाऊक असतात. पर्यावरणावर होणारे घातक परिणाम रोखण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
भारतीय संतांचे केवळ पुरुषच नाही तर स्त्रियाही अनुयायीत्व स्वीकारत. म. बसवेश्वरांनी त्यांच्या शिष्यांमध्ये स्त्रियांना समान स्थान दिले. “अनुभव मंटप’ ही जगातली पहिली लोकशाही संसद त्यांनी स्थापन केली. स्त्रियांचे हे वैचारिक पुरोगामित्व तेथेच थांबले नाही, ते पिढ्यान्पिढ्या पाझरत राहिले. माता जिजाऊंसारखी झुंजार स्त्री छत्रपती शिवरायांना जन्म देऊन थांबली नाही तर स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या काळजात सतत कसे प्रज्वलित होत राहील याकडे तिने लक्ष दिले. आजची भारतीय स्त्री पोळीसाठी हाती लाटणे घेते आणि कॉम्प्युटरसाठी माऊस.
ती हेलिकॉप्टर-विमान-रेल्वे-कार अशी सारी वाहने लीलया चालवते. ती कंपनीची प्रमुख बनते, ती सैन्यात उच्चपदस्थ होते, ती शस्त्र चालवते तशी लेखणीही चालवते, ती लेखिका-पत्रकार-चित्रकार-संशोधक-शिल्पकार-नृत्यकार म्हणून यशस्वी होताना दिसते. ती प्रचंड शिकते आणि परदेशात जाऊन भारताचा डंका वाजवते. भारतीय तरुणही आम्ही कुठेही कमी नाही हे सिद्ध करतो. अमेरिकेत सर्वात जास्त संख्येने भारतीय तरुण सिलिकॉन व्हॅलीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात.
भारतीय माणूस युनोमध्ये काम करतो, संयुक्त राष्ट्रसंघात, डब्ल्यू.एच.ओ.अर्थात जागतिक आरोग्य संघटनेत, नासात या जागतिक पातळीवर अत्यंत नामवंत असणाऱ्या संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावतो, ही गोष्ट सामान्य नव्हे. भारतात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य भाषा आणि त्या भाषांच्या बोलीभाषा हे भारताचे अमूल्य असे धन आहे. या भाषांचा अभ्यास करण्यासाठी विविध देशांतील भाषा अभ्यासक येथे येतात. या भाषांचे व्याकरण हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकतो. येथील लोकसंस्कृतीची परंपरा कमालीची वैभवशाली आणि
सर्वसमावेशकत्व असणारी आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला जगात तोड नाही. पारंपरिक खेळांसोबत आधुनिक खेळातही भारतीय मागे नाहीत. येथील सिनेमा जगभरात बघितले जातात. आयुर्वेदासारखी आरोग्याला वाहिलेली प्रभावी ज्ञानशाखा जगात दुसरीकडे कुठेही नाही. भाषिक-प्रांतिक-शारीरिक वैविध्य हे येथील वैशिष्ट्य ठरावे. सर्व जाती-धर्म-पंथांचे लोक एवढ्या मोठ्या संख्येने शेकडो वर्षांपासून येथे एकमेकांच्या हातात हात घालून वावरत आहेत,
ही भारतीय सम्यक विचारांची प्रमुख खूण ठरावी. इंच-इंच सीमेसाठी जीवाची बाजी लावणारे भारतीय लष्कर आज अत्याधुनिक शस्त्रांनी आणि कमालीच्या मनोधैर्याने देशाच्या सीमांवर विलक्षण निष्ठेने उभे आहे. हिमालय नावाचा नगाधिराज भारताचा कळस तर कन्याकुमारीचा समुद्र भारताचा पाया आहे.
“माझ्या बंधु-भगिनींनो’ या वाक्याने जागतिक धर्म परिषद जिंकून घेणारे स्वामी विवेकानंद यांचा विचार स्वीकारणाऱ्या या भारताला महासत्तेच्या स्वरूपात बघण्याचे स्वप्न राष्ट्रपती-शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी बघितले होते. गेल्या सात दशकांच्या प्रगतीचा विचार केला तर कलामांचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास थोडाच कालावधी उरला आहे याची खात्री पटते.