मुंबई – कोविड साथीच्या यशस्वी हाताळणीबद्दल मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे. मुख्य न्यायाधिश दीपंकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने कोविड मदतीच्या संबंधात दाखल करण्यात आलेल्या अनेक जनहित याचिका निकाली काढताना हे कौतुक केले आहे.
ज्या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी या याचिका दाखल केल्या होत्या त्यातील बहुतांशी मदत त्यांना राज्य सरकारकडून झाल्याने याचिकाकर्त्यांनीच या याचिका मागे घेण्याची अनुमती हायकोर्टाकडे मागितली होती. त्यांना ती अनुमती देताना, मागचे सगळे आता विसरा आणि नवीन वर्षात नवीन सुरूवात होऊ दे अशी अपेक्षा धरा असेही हायकोर्टाने या संबंधात म्हटले आहे.
कोविड हाताळणीत महाराष्ट्र राज्य यशस्वी राज्यांपैकी एक आहे हे नमूद करताना आम्हाला जराही संकोच वाटत नाही असे कोर्टाने या अनुषंगाने नमूद केले आहे. आजही अनेक राज्यांमध्ये कोर्टात प्रत्यक्ष उपस्थितीतील सुनावणी सुरू नाही. पण महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे काम झाले आहे असेही कोर्टाने निदर्शनाला आणून दिले आहे.
सन 2020 मध्ये आपल्याला कोविड विषयी काहीही माहिती नव्हते, पण यावर्षी एप्रिल मध्ये आपण दुसऱ्या लाटेच्यावेळी चांगले काम केले आहे. हीच कामगिरी सुरू ठेवावी आणि पुन्हा आपल्यावर वाईट दिवस येऊ नयेत असेही कोर्टाने म्हटले आहे.